Kalyan Banerjee VS Mahua Moitra: कोलकाता येथील लॉ कॉलेजमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अत्याचाराच्या घटनेवर तृणमूल काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या वादग्रस्त टिप्पण्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. दुसरीकडे टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना धारेवर धरलं. महिलांबद्दलचा द्वेष कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही, फरक एवढाच आहे की टीएमसी अशा घृणास्पद टिप्पण्यांचा निषेध करते, मग त्या कोणीही केल्या तरी, असं मोईत्रा म्हणाल्या. महुआ मोईत्रा यांनी केलेल्या टीकेला खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख केला.
कोलकाता येथील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि आता पक्षाचे आमदार मदन मित्रा यांनी वादग्रस्त विधाने केली. वादग्रस्त विधानांवर टीका करताना खासदार महुआ मोईत्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे कारण तो त्यांच्या नेत्यांनी केलेल्या मूर्खपणाचा निषेध करण्यास मागेपुढे पाहत नाही, असं म्हटलं. मोईत्रा यांना प्रत्युत्तर देताना कल्याण बॅनर्जी यांनी त्यांनी त्यांच्या लग्नावरुन टीका केली.
कल्याण बॅनर्जी यांनी मोइत्रा यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली आहे. मोईत्रांनी ४० वर्षांपासून विवाहित असलेल्या पुरुषाचा संसार तोडल्याचे बॅनर्जी म्हणाले. "महुआ तिच्या हनिमूननंतर भारतात परत आली आहे आणि माझ्याशी भांडू लागली आहे. ती माझ्यावर महिलाविरोधी असल्याचा आरोप करते, पण ती स्वतः काय आहे? तिने ४० वर्षांचे लग्न मोडले आहे आणि ६५ वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. तिने त्या महिलेला दुखावले नाही का?" असा सवाल कल्याण बॅनर्जी यांनी केला.
"नीतिनियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संसदेतून काढून टाकण्यात आलेली एक खासदार मला उपदेश देत आहे. ती सर्वात मोठी महिलाविरोधी आहे. तिला फक्त तिचे भविष्य कसे सुरक्षित करायचे आणि पैसे कसे कमवायचे हे माहित आहे," असेही कल्याण बॅनर्जी म्हणाले.
दरम्यान, कोलकाता अत्याचार प्रकरणानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धक्कादायक विधान केले होते. घाणेरडी मानसिकता असलेल्या पुरुषांसोबत बाहेर जाण्यापूर्वी महिलेने कोणासोबत जातोय याची काळजी घेतली पाहिजे, असं बॅनर्जी म्हणाले. दुसरीकडे टीएमसीचे आमदार मदन मित्रा यांनीही जर ती विद्यार्थिनी एकटी कॉलेजमध्ये गेली नसती तर ती ही दुर्दैवी घटना टाळू शकली असती, असं म्हटलं.