निवडणुकीतील मतमोजणी आणि निकालांवरून होणारे वाद हे आपल्या लोकशाहीमध्ये नवे नाहीत. अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत निवडणुकीच्या निकालांवरून आपल्याकडे वाद होत असतात. निकालांमध्ये गडबड झाल्याचा संशय घेतला जातो. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील फार्रुखाबाद येथील रूनी चुरसाई ग्रामपंचातीत घडला आहे. येथील सरपंचपदाच्या निवडीवरून सुमारे चार वर्षे वाद सुरू होता. अखेर आज त्याचा निकाल समोर आला आहे. २०२१ मध्ये ज्या महिला उमेदवाराला २ मतांनी पराभूत घोषित करण्यात आले होते. त्या चार वर्षांनंतर झालेल्या पुनर्मतमोजणीत दोन मतांनी विजयी झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या या पुनर्मतमोजणीमुळे आधीच्या मतमोजणीमध्ये गडबड झाल्याचे सिद्ध झाले आहे.
उत्तर प्रदेशमधील फार्रुखाबाद येथील रूनी चुरसाई ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी ३ मे २०२१ रोजी मतदान झालं होतं. त्यावेळी प्रतीभा देवी यांना ४८० तर महावीर यांना ४८२ मतं मिळाली होती. तसेच प्रतिभा देवी यांचा केवळ दोन मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यांनी या निकालाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुमारे चार वर्षे न्यायालयीन खटला सुरू होता. अखेरीस कोर्टाच्या आदेशानुसार पुन्हा मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीमध्ये प्रतिभा देवी यांना मिळालेल्या मतांची संख्या वाढून ४८४ एवढी झाली. तर महावीर यांना मिळालेली मते तेवढीच राहिली.
जहानगंज फार्रुखाबाद मार्गावर असलेल्या ब्लॉक कार्यालयात ही मतमोजणी झाली. तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमामावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुन्हा करण्यात आलेल्या मजमोणीमध्ये प्रतिभा देवी या दोन मतांनी आघाडीवर गेल्या आणि विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ही पुनर्मतमोजणी सुरू असताना येथील वातावरण खूप तणावपूर्ण होते. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.