"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:55 IST2025-11-19T15:53:35+5:302025-11-19T15:55:14+5:30
एवढेच नाही तर, “भारतातील कुठळ्याही मौलवीने दिल्ली बॉम्बस्फोटाचा अद्यापही विरोध केलेला नाही. जेवढा शिकलेला मुसलमान, तेवढाच मोठा दहशतवादी!” असेही रघुराज सिंह म्हणाले.

"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील राज्यमंत्री (दर्जा प्राप्त) ठाकूर रघुराज सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटासंदर्भात बोलताना त्यांनी थेट मदरसे आणि मशिदींनाच लक्ष्य केले. “मदरसे आणि मशिदींमध्ये दहशतवादी तयार होतात. यामुळे हे तत्काळ बंद करायला हवेत, जेणेकरून त्यांना अटकाव घालता येईल." असे रघुराज सिंह यांनी म्हटले आहे.
"जेवढा शिकलेला मुसलमान, तेवढाच मोठा दहशतवादी!” -
एवढेच नाही तर, “भारतातील कुठळ्याही मौलवीने दिल्ली बॉम्बस्फोटाचा अद्यापही विरोध केलेला नाही. जेवढा शिकलेला मुसलमान, तेवढाच मोठा दहशतवादी!” असेही रघुराज सिंह म्हणाले.
AMU वरही निशाणा :
यावेळी रघुराज सिंह यांनी अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी (AMU) वरही निशाणा साधला. "एएमयू हा देखील दहशतवाद्यांचा अड्डा आहे. येथून बुरहान वानीसारखे दहशतवादी बाहेर पडले आहेत," असा गंभीर आरोप करत, एएमयूचीही कसून चौकशी व्हायला हवी. अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, देशात अल्पसंख्याक संस्थाच असू नयेत, त्या अल्पसंख्याक नावाखाली अत्याचार आणि बलात्कारासारख्या घटना करतात, असे आक्षेपार्ह विधानही त्यांनी केले.
विरोधी पक्षांकडून अथवा भाजपच्या इतर नेत्यांकडूनही अद्याप प्रतिक्रिया नाही -
रघुराज सिंह यांनी यापूर्वीही एएमयू संदर्भात भाष्य केले आहे. मात्र त्यांच्या या विधानानंतर, विरोधी पक्षांकडून अथवा भाजपच्या (BJP) इतर नेत्यांकडूनही अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी प्रशासनाकडूनही यासंदर्बात अद्याप कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही.