Rajasthan Accident: तुम्ही कितीही महागड्या आणि सुरक्षित गाडीतून प्रवास करा, पण नशीबात मृत्यू लिहिलेला असेल, तर तो कोणालाही टाळता येत नाही. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर 2 कोटी रुपयांच्या आलिशान BMW कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ माहेश्वरी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचा अक्षरशः चुराडा झाला.
कसा घडला अपघात?
हा अपघात अलवर जिल्ह्यातील रेणी पोलीस ठाणे हद्दीत दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर घडला. वल्ल्भ माहेश्वरी हे जयपूरहून बडौदामेवकडे जात असताना त्यांची लक्झरी BMW कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या भिंतीवर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातात माहेश्वरी गंभीर जखमी झाले, तर चालकाला किरकोळ दुखापत झाली.
वेगाने घेतला बळी...
कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा ताबा सुटला अन् वाहन थेट पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकले. धडकेचा आवाज इतका मोठा होता की, परिसरात मोठा स्फोट झाल्याचा भास झाला. आवाज ऐकून परिसरातील लोक तातडीने घटनास्थळी धावले. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या उद्योगपती आणि चालकाला बाहेर काढणे सोपे नव्हते. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ प्रशासन आणि एक्सप्रेसवे कंट्रोल रूमला माहिती दिली.
थोड्याच वेळात पेट्रोलिंग पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाला कारची अवस्था पाहता मोठी कसरत करावी लागली. काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांना कारमधून बाहेर काढण्यात यश आले. जखमींना तातडीने पिनान येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र माहेश्वरी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने अलवरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
अलवरमधील खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु त्यांना झालेल्या दुखापती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना वाचवता आले नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.
एक्सप्रेसवेवर वारंवार अपघात
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा देशातील अत्याधुनिक आणि वेगवान महामार्गांपैकी एक मानला जातो. मात्र, अतिवेगामुळे येथे अपघातांचा धोका कायम असतो. गेल्या काही काळात या एक्सप्रेसवेवर अनेक मोठे अपघात घडले आहेत. तज्ज्ञांच्या मते, लांब आणि सरळ रस्ता असल्याने चालकांना अनेकदा झोप येते, जी गंभीर अपघातांचे कारण ठरते.
वल्लभ माहेश्वरी काय करायचे?
वल्लभ माहेश्वरी हे शकुन ग्रुपचे संचाकल होते. 2000 साली स्थापन झालेला हा ग्रुप संसाधन प्रक्रिया आणि औद्योगिक सेटअप क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहे. हा ग्रुप केवळ कच्च्या मालावर प्रक्रिया करत नाही, तर अंतिम ग्राहकांना उत्पादने वाहतूक आणि वितरित देखील करतो. त्यांच्या निधनाने जयपूरच्या औद्योगिक समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Web Summary : A prominent industrialist, Vallabh Maheshwari, died in a horrific BMW crash on the Delhi-Mumbai Expressway in Rajasthan. His speeding car hit a bridge wall, resulting in his immediate death. The driver sustained minor injuries. Over-speeding on this expressway is a known hazard.
Web Summary : राजस्थान में दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे पर एक भयावह बीएमडब्ल्यू दुर्घटना में एक प्रमुख उद्योगपति, वल्लभ माहेश्वरी की मौत हो गई। तेज गति से जा रही उनकी कार एक पुल की दीवार से टकरा गई, जिसके परिणामस्वरूप उनकी तत्काल मृत्यु हो गई। चालक को मामूली चोटें आईं। इस एक्सप्रेसवे पर ओवर-स्पीडिंग एक ज्ञात खतरा है।