मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 10:38 IST2026-02-15T10:36:58+5:302026-02-15T10:38:38+5:30
PM Modi Bangladesh Visit: बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान १७ फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण मिळाले असले तरी त्याच दिवशी मुंबईत मॅक्रॉन यांच्याशी बैठक आहे. वाचा सविस्तर वृत्त.

मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत...
बांगलादेशातील ऐतिहासिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर बीएनपी नेते तारिक रहमान १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी ढाका येथून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १३ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना अधिकृत निमंत्रण धाडले आहे. मात्र, त्याच दिवशी मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत मोदींची महत्त्वाची द्विपक्षीय बैठक असल्याने, पंतप्रधान स्वतः ढाका दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवण्यात येत आहे.
सुमारे १७ वर्षांच्या वनवासानंतर तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या राजकारणात झंझावाती पुनरागमन केले आहे. त्यांच्या 'बांगलादेश नॅशनल पार्टी'ने २९७ पैकी २०९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर त्यांच्या सोबतीला असलेल्या जमात-ए-इस्लामीला ६८ जागा मिळाल्या आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीगला या निवडणुकीत सहभाग घेता आला नाही, त्यामुळे ही सत्तापालट बांगलादेशच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने भारतासह चीन, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की, यूएई आणि कतार यांसारख्या १३ देशांना आमंत्रित केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ या सोहळ्याला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.
भारत-बांगलादेश संबंध आणि 'हसीना' पेच
पंतप्रधान मोदींनी तारिक रहमान यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले आहे. "भारत आणि बांगलादेश हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यांनी जोडलेले शेजारी आहेत," अशा शब्दांत मोदींनी दोन्ही देशांच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला. मात्र, सध्या भारतात असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी नव्या सरकारकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारत आपल्या शेजारील राष्ट्राशी कूटनीतिक संबंध कसे हाताळतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
फ्रान्ससोबतची बैठक की ढाका दौरा?
१७ फेब्रुवारीला मुंबईत होणारी मोदी-मैक्रॉन बैठक भारताच्या युरोप धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संरक्षण, इंडो-पॅसिफिक क्षेत्र आणि तंत्रज्ञान या विषयांवर येथे चर्चा होणार आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी स्वतः न जाता भारताचा एखादा वरिष्ठ सरकारी प्रतिनिधी किंवा मंत्री ढाका येथील सोहळ्याला उपस्थित राहू शकतो, असे संकेत मिळत आहेत.