द्रमुकच्या घराणेशाहीला जनता कंटाळली : जे.पी. नड्डा यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 06:13 IST2026-04-15T06:12:44+5:302026-04-15T06:13:06+5:30
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

द्रमुकच्या घराणेशाहीला जनता कंटाळली : जे.पी. नड्डा यांचं विधान
चेन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू ही 'गुन्हेगारीची राजधानी' बनली असून जनता आता घराणेशाहीपासून मुक्ती इच्छित आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा २,००० रुपयांची मदत, वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर आणि ई-स्कूटर खरेदीसाठी २५,००० रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे.
राज्याला गांजामुक्त करणार
राज्याला 'गांजा-मुक्त' करण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचे सांगत भाजपने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी 'उझावे थाई' योजनेतून वार्षिक ९,००० रुपयांची मदत आणि बेरोजगार तरुणांच्या शैक्षणिक कर्जाची माफी यांसारख्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.