कुमारस्वामी सरकारवरील संकट टळता टळेना, काँग्रेसच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 20:13 IST2019-01-18T20:12:07+5:302019-01-18T20:13:18+5:30
कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आणि विरोधी भाजपा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक सादर होत आहेत.

कुमारस्वामी सरकारवरील संकट टळता टळेना, काँग्रेसच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
बंगळुरू - कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आणि विरोधी भाजपा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक सादर होत आहेत. राज्यात सत्तांतर घडवून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी करून काही तास उटलत नाहीत तोच पुन्हा एकदा उलथापालथीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज बोलावलेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा चर्चांना उत आला आहे.
कर्नाटकमधील सत्तांतराचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आज आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेच समोर आले आहे. मात्र चार आमदार अनुपस्थित राहिले असले तरी राज्यातील कुमारस्वामी सरकारला सध्यातरी कुठल्याही स्वरूपाचा धोका नाही.
दरम्यान, काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या यांनी आज होणाऱ्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास संबंधित आमदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र असे असतानाही रमेश जरकीहोळी, बी. नागेंद्र, उमेश जाधव आणि महेश कुमाहट्टी हे चार आमदार अनुपस्थित राहिले. रमेश जरकीहोळी यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून ते प्रचंड नाराज आहेत.
Siddaramaiah, Congress after CLP meeting: 76 MLAs were present physically out of the 79. I will send notice to absentees and seek an explanation. Then I will speak to the high command #Karnatakapic.twitter.com/BEmFfEgqky
— ANI (@ANI) January 18, 2019
आज झालेल्या कर्नाटकमधील काँग्रेस आमदारांच्या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धारामय्या, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्यातील इतर नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील सरकारला कुठलाही धोका नसल्याचे आणि भाजपा सरकार अस्थिर करण्याचे विनाकारण प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.