'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:40 IST2025-06-19T17:39:47+5:302025-06-19T17:40:27+5:30
Shashi Tharoor: 'मी माझी भूमिका बदललेली नाही.'

'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
Shashi Tharoor on Congress: काँग्रेस नेते शशी थरुर आणि त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद असल्याची चर्चा माध्यमांमध्ये ऐकायला मिळत होती. पण, आज (१९ जून २०२५) स्वतः थरुर यांनीच त्यांचे पक्ष नेतृत्वातील काही नेत्यांशी मतभेद असल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी काँग्रेस, पक्षाची मूल्ये आणि कार्यकर्ते खूप प्रिय असल्याचेही म्हटले.
काय म्हणाले शशी थरुर ?
मीडियाश संवाद साधताना थरुर म्हणाले, माझे मत काँग्रेस नेतृत्वातील काही लोकांपेक्षा वेगळे आहे. मी कशाबद्दल बोलतोय, हे तुम्हाला माहिती आहे. त्यातील काही मुद्दे सार्वजनिक आहेत, माध्यमांनी त्याबद्दल वार्तांकनही केले आहे. मात्र, त्यांनी त्यांचे मतभेद राष्ट्रीय नेतृत्वाशी आहेत की, राज्य नेतृत्वाशी आहेत, हे स्पष्ट केले नाही.
...तिथे मी जात नाही - थरुर
पोटनिवडणुकीच्या प्रचारात का सहभागी झाले नाही असे विचारले असता थरूर म्हणाले की, त्यांना यासाठी आमंत्रित केले गेले नव्हते. मला आमंत्रित केले, जात नाही तिथे मी जात नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी असेही सांगितले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रचाराचे प्रयत्न यशस्वी व्हावेत आणि निलांबूर येथील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) उमेदवार विजयी व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे.
माझे लक्ष भारताच्या परराष्ट्र धोरणावर
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या त्यांच्या अलिकडच्या संभाषणाबद्दल थरूर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात विविध देशांच्या शिष्टमंडळांच्या भेटी आणि तेथे झालेल्या चर्चेबद्दल चर्चा झाली. देशांतर्गत राजकारणाचा कोणताही विषय चर्चेत आला नाही. थरुर यांनी केंद्रीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे निमंत्रण स्वीकारण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की, जेव्हा ते संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांचे लक्ष भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि राष्ट्रीय हितावर असेल, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर नाही.
ते पुढे म्हणाले, मी माझी भूमिका बदललेली नाही. जेव्हा देशाशी संबंधित एखादा मुद्दा येतो, तेव्हा देशासाठी काम करणे आणि बोलणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मी जे काही बोललो, ते माझे स्वतःचे मत होते. मी अभिमानाने भारतीय नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडले, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.