आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:38 IST2025-06-01T13:38:00+5:302025-06-01T13:38:47+5:30
Shashi Tharoor: शशी थरुर परदेशात भारताची बाजू मांडत असताना काँग्रेस नेते त्यांच्यावरच टीका करत आहेत.

आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी ते जगभरात भारताची बाजू मांडत आहेत. पण, यादरम्यान काही काँग्रेस नेते त्यांच्या अनेक विधानांवर नाराज असून, त्यांच्यावर सातत्याने टीकाही करत आहेत. अशातच, थरूर यांनी या सर्व टीकांवर स्पष्टपणे भाष्य केले.
टीकेवर शशी थरूर यांचे उत्तर
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या अनेक टीकांबाबत थरुर यांना विचारले असता ते म्हणाले, 'मला वाटते की, आपण आपले ध्येय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. एका समृद्ध लोकशाहीत टीका होणे साहजिक आहे. पण, मी यावेळी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. मी भारतात परत येईल, तेव्हा सहकाऱ्यांशी, टीकाकारांशी, माध्यमांशी बोलेन, त्यांना योग्य ते उत्तर देईन. सध्या आम्ही ज्या देशांमध्ये जात आहोत, त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि येथील लोकांपर्यंत भारताचा संदेश पोहोचवणे गरजेचे आहे,' असे थरुर म्हणाले.
#WATCH | Brasilia, Brazil: When asked about criticism and questions raised by Congress, Congress MP Shashi Tharoor says, "I think this is a time now for us to focus on our mission. Undoubtedly, in a thriving democracy, there are bound to be comments and criticisms, but I think at… pic.twitter.com/24bKFJ3dM5
— ANI (@ANI) June 1, 2025
काँग्रेस नेत्यांची टीका
काँग्रेस नेते उदित राज यांनी शशी थरुर यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले, परंतु त्यांनी काँग्रेसविरुद्ध विधाने देऊन हे स्पष्ट केले की, त्यांना काँग्रेसचे कल्याण नको आहे. दुसरीकडे, पवन खेरा म्हणाले की, थरूर यांनी त्यांच्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकवर टीका केली होती, परंतु आता ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याचे कौतुक करत आहेत. पंतप्रधान मोदींनी थरूर यांना त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा परराष्ट्र मंत्री बनवावे, कारण थरूर फक्त भाजपसाठी काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.
भाजपने केले कौतुक
एकीकडे काँग्रेस शशी थरुर यांना लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे भाजप त्यांच्या कामाचे कौतुक करत आहे. भाजप म्हणते की, विरोधी पक्ष असूनही शशी थरुर यांना इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ते ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. परंतु काही काँग्रेस नेते त्यांच्या कामावर टीका करत आहेत. यावरून काँग्रेसमधील निराशा आता हळूहळू बाहेर येत असल्याचे दिसून येते.