"मला तिच्यापासून सुटका हवीय, त्यासाठी शिक्षा द्या"; सासू-जावयाच्या लव्हस्टोरीचा धक्कादायक शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:04 IST2026-02-13T14:03:40+5:302026-02-13T14:04:23+5:30
सासू आणि जावई, जे दहा महिने पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघेही आता एकमेकांवर आरोप करत आहेत.

फोटो - आजतक
अलिगडचे सासू आणि जावई, जे दहा महिने पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोघेही आता एकमेकांवर आरोप करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता जावई राहुलने पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे. राहुलचा दावा आहे की, ते दोघे आधी सीतामढी जिल्ह्यातील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकत्र राहत होते. सासू घरातून दोन लाख रुपये रोख, मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या घेऊन पळाली आहे. तसेच सासूपासून सुटका हवी असल्याचं म्हणत आहे.
माझे सर्व पैसे आणि दागिने घेऊन ती निघून गेली आणि आता उलट माझ्यावरच आरोप करत आहे असं राहुलचं म्हणणं आहे. आपल्याला कायदेशीर कारवाईत अडकवलं जाऊ शकतं, अशी भीती राहुलला वाटतेय. तो म्हणतो, "एकतर मुलांच्या माध्यमातून संपर्क साधला जाईल किंवा माझ्यावर गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये पाठवलं जाईल. मात्र मी दोषी असेन तर मला नक्कीच शिक्षा मिळावी."
"मी कोणासोबतही पळून गेलेले नाही"
राहुलच्या सांगण्यानुसार, सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं. ते दोघे प्रेमाने राहत होते आणि पोलीस स्टेशन तसेच संबंधित केंद्रांनाही याची माहिती होती. दोघेही 'लिव्ह-इन'मध्ये राहत होते आणि कोणतीही जबरदस्ती नव्हती असा राहुलचा दावा आहे. परंतु महिलेची बाजू याच्या अगदी उलट आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात तिने स्पष्टपणे म्हटलं आहे की, "मी कोणासोबतही पळून गेलेले नाही, मला अडकवण्यात आलं आहे." तिच्या मते, सुरुवातीचा एक महिना ठीक होता, पण त्यानंतर परिस्थिती बदलली. तो मला ओलीस ठेवल्याप्रमाणे वागवू लागला. मला कुठेही येऊ-जाऊ देत नव्हता, इतकेच काय तर मला अंमली पदार्थ (नशा) देखील द्यायचा असा गंभीर आरोप तिने केला आहे. सोबत आणलेले पैसे आणि दागिने राहुलनेच खर्च केल्याचंही तिचं म्हणणं आहे.
महिलेचा दावा आहे की, ती मोठ्या कष्टाने तिथून बाहेर पडू शकली. "मी त्याच्या तावडीतून सुटून आले आहे आणि आता तो मला बदनाम करत आहे. जर मी चुकीची असते, तर स्वतःहून पोलीस ठाण्यात का आले असते?" असा सवाल तिने उपस्थित केला आहे. आपल्याबद्दलची ही गोष्ट एकतर्फी असून केवळ सत्य समोर यावं, अशी तिची इच्छा आहे.
"मला फक्त तिच्यापासून सुटका हवी"
राहुलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मारहाण किंवा ओलीस ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. दहा महिन्यांनंतर आता मारहाणीची गोष्ट का आठवली असा सवाल तो करतोय. राहुलचा असाही आरोप आहे की, या महिलेला वारंवार जोडीदार बदलण्याची सवय आहे. "माझ्यासोबत आता कोणीही नाही. ना आई-वडील, ना भाऊ-बहीण. माझ्यामुळे सर्वजण त्रासलेले आहेत. आता एकच मागणी आहे की, या नात्यातून मुक्ती मिळावी. मला फक्त तिच्यापासून सुटका हवी आहे, मग त्यासाठी मला कोणतीही शिक्षा द्या" असं म्हटलं आहे.