अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी रामलल्लासाठी भेट म्हणून चांदीचा कुंभ कलश आणला. मात्र, हा चांदीचा कुंभ कलश ते गाडीतच विसरले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा ते गाडीच्या दिशेने गेले आणि त्यांनी चांदीचा कुंभ कलश आणला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी पंतप्रधान गाडीमधून खाली उतरले आणि राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांना रामलल्लासाठी आणलेला चांदीचा कुंभ कलश आठवला. त्यानंतर ते स्वत: गाडीच्या दिशेने गेले आणि रामलल्लासाठी भेट म्हणून आणलेला चांदीचा कुंभ कलश घेऊन पुन्हा राम मंदिर भूमिपूजनाकडे निघाले. याआधी नरेंद्र मोदींनी हनुमानगढीला भेट देऊन हमुमानाचे दर्शन घेतले.
राम मंदिराचे विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी माझे येथे येणे स्वाभाविकच होते. कन्या कुमारीपासून क्षीर भवानीपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्वीपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय झाले आहे. आज इतिहास रचला जात आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, 'राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम', असे म्हणत शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदिबेन पटेल, नृत्यगोपालदास महाराज, चंपतरायजी आदी उपस्थित होते.
...अन् नरेंद्र मोदींनी २९ वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला!२९ वर्षांपूर्वी ‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. नरेंद्र मोदी १९९१ मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. त्यावेळी ‘तिरंगा यात्रे’ यात्रा कन्याकुमारीमधून सुरु झाली होती. या यात्रेत मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधितही केले होते. महेंद्र त्रिपाठी यांनी त्यावेळी नरेंद्र मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार? असा असा सवाल केला होता. त्यावर ज्या दिवशी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, तेव्हा मी पुन्हा येईन असे उत्तर दिले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी २९ वर्षांपूर्वी दिलेले आपले आश्वासन पूर्ण केले आहे.