आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:42 IST2025-06-25T10:40:46+5:302025-06-25T10:42:53+5:30

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

Prime Minister Narendra Modi criticises Congress for 1975 Emergency | आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.  इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली, हा तोच काळ आहे, जेव्हा काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"कोणाताही भारतीय आणीबाणीचा काळ विसरू शकत नाही. त्यावेळी संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४२ वी घटनादुरुस्ती ही त्यांच्या कृतींचे एक उत्तम उदाहरण आहे", असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

"आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठाम राहिलेल्या प्रत्येकाला आम्ही सलाम करतो. त्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत काम केले. भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले", असेही मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले की, "जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा मी संघाचा एक तरुण प्रचारक होतो. आणीबाणीविरोधी चळवळीदरम्यान राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने त्यातील काही अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे, याचा मला आनंद आहे. या पुस्तकाची प्रस्तावना एचडी देवेगौडा यांनी लिहिली आहे, जे स्वत: आणीबाणीविरोधी चळवळीचा चेहरा होते."

"आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांची आठवण असलेल्या किंवा ज्यांच्या कुटुंबांनी त्या काळात त्रास सहन केला आहे, अशा सर्वांना मी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन करतो. यामुळे १९७५ ते १९७७ या लज्जास्पद काळाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होईल", असे मोदींनी म्हटले आहे. तसेच आपल्या संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत. आपण प्रगतीच्या नवीन उंची गाठू आणि गरीब आणि वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, असेही ते म्हणाले.

Web Title: Prime Minister Narendra Modi criticises Congress for 1975 Emergency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.