राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:01 IST2025-06-07T18:00:24+5:302025-06-07T18:01:24+5:30
वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत.

राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका लेखाने देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. राहुल गांधी यांचा हा लेख एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. या लेखात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड-गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. 'निवडणुकीत गडबड-गोंधळ करून भाजपला फायदा झाला,' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या लेखावर निशाणा साधत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा नवा लेख म्हणजे एकामागून एक निवडणूक हरल्याचे त्यांचे दुःख आणि निराशेमुळे, बनावट नरेटिव्ह सेट करण्याची ब्लूप्रिंट आहे.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये जेपी नड्डा म्हणाले, "राहुल गांधी यांचा नवा लेख, एकापाठोपाठ एक निवडणूक हारल्याचे त्यांचे दुःख आणि निराशेमुळे, बनावट नरेटिव्ह सेट करण्याची ब्लूप्रिंट आहे.'
नड्डा पुढे म्हणाले, 'ते' हे सर्व स्टेप बाय स्टेप करतात.
स्टेप 1: त्यांच्या कृत्यामुळे काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते.
स्टेप 2: आत्मपरीक्षण करण्याऐवजी, ते विचित्र कट कारस्तान रचत असतात आणि फसवणुकीचा आरोप करतात.
स्टेप 3: सर्व तथ्ये आणि आकडेवारी कडे दुर्लक्ष करतात.
स्टेप 4: कुठल्याही पुराव्याशिवाय संस्थांची बदनामी करतात.
स्टेप 5: त्यांना तथ्यांपेक्षा अधिक बातमीत राहण्याची आशा असते.
वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत. लोकशाहीला नाटकाची गरज नाही. तिला सत्याची आवश्यकता आहे," असेही नड्डा यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या आक्षेपांवर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? -
जोवर राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत, जोवर ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोवर त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते, स्वतःशीच खोटे बोलून, स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान, रोज खोटे बोलले की लोकांना ते खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळेच त्याच त्या गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आक्षेपांवर प्रत्युत्तर दिले.