राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:35 IST2026-02-05T20:35:04+5:302026-02-05T20:35:44+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता, काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

राज्यसभेतून विरोधक बाहेर, नेमका गोंधळ कशामुळे झाला? मल्लिकार्जुन खरगेंनी स्पष्टच सांगितलं!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता, काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षांनी सभात्याग केला. "सरकार विरोधकांचा आवाज दाबत असून देशाच्या महानायकांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे," असा खळबळजनक आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
लोकसभेत राहुल गांधींना बोलू देत नाहीत!
राज्यसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "मोदी सरकारने जणू काही ठरवूनच टाकले आहे की दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्यायचे नाही. गेल्या चार दिवसांपासून लोकसभेत राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले जात आहे. लोकशाहीत जर विरोधी पक्षनेत्यालाच बोलू दिले जात नसेल, तर हा संसदेचा अपमान आहे. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते."
महापुरुषांचा अपमान आणि सरकारचे मौन
खरगे यांनी एका गंभीर मुद्द्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. "ज्या नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, तुरुंगवास भोगला, त्यांच्याबद्दल सभागृहात अपशब्द वापरले जात आहेत. एखादी व्यक्ती माईकवर मनमानीपणे शिवीगाळ करते आणि सरकारचे लोक गप्प बसून राहतात. भाजपने कधीही अशा विधानांचा निषेध केला नाही. म्हणूनच आम्ही ठरवले की, जर आम्हाला बोलू दिले जात नसेल तर आम्ही निषेध नोंदवत सभात्याग करू," असे खरगे यांनी स्पष्ट केले.
मोदी तेच करतात जे ट्रम्प सांगतात!
परराष्ट्र धोरणावरूनही खरगे यांनी सरकारला घेरले. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबत व्यापार करार करून देशाच्या शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिला आहे. ट्रम्प जे सांगतात, मोदी तेच करत आहेत. हे सरकारने कोणासमोर गुडघे टेकले आहेत?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न
काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, राहुल गांधी हे कोट्यवधी भारतीयांचा आवाज आहेत. त्यांना संसदेत बोलण्यापासून रोखणे म्हणजे लोकशाहीचा गळा आवळण्यासारखे आहे. आम्ही कोणताही गोंधळ घालत नव्हतो, आम्हाला फक्त सामाजिक न्याय, तरुणांचा रोजगार आणि देशाच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलायचे होते. मात्र, सरकारने विरोधकांशी संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग निवडला आहे. या वॉकआउटमुळे राज्यसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.