दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:06 IST2025-06-26T09:05:31+5:302025-06-26T09:06:15+5:30
Operation Sindoor: चीनमधील किंगदाओ येथे सुरू असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्येही भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे पडसाद उमटले असून, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनसमोरच पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...
गेल्या अनेक वर्षांपासून भारताविरोधातीलदहशतवादी कारवायांना पाकिस्तान आपल्या भूमीमधून सातत्याने खतपाणी घालत आला आहे. पाकिस्तानपुरस्कृतदहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत भारताचे हजारो जवान आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या काही काळापासून भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, एप्रिल महिन्यात पहलगलाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत थेट पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. एवढंच नाही तर या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारताने थेट पाकिस्तानी सैन्याच्या हवाई तळांना लक्ष्य करून पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. दरम्यान, सध्या चीनमधील किंगदाओ येथे सुरू असलेल्या शांघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीमध्येही भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे पडसाद उमटले असून, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या चीनसमोरच पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.
या परिषदेसाठी चीनमध्ये गेलेले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आपल्या प्रदेशामध्ये सर्वात मोठी आव्हानं ही शांतता, संरक्षण आणि परस्पर अविश्वासाशी संबंधित आहेत. तसेच या समस्यांचं कारण वाढता कट्टरतावाद, अतिरेकी आणि दहशतवादी आहेत. शांतता आणि समृद्धी ही दहशतवाद आणि दहशतवादी समुहाच्या हातात विध्वंसक हत्यारं असताना राहू शकत नाही. या आव्हानांचा सामना करण्यासाठी निर्णायक कारवाईची आवश्यकता आहे. तसेच या आव्हानांविरोधात लढण्यासाठी आणि आपल्या सामुहिक सुरक्षेसाठी आपण एकजूट झालं पाहिजे.
राजनाथ सिंह म्हणाले का, जे लोक दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. तसेच आपल्या संकुचित आणि स्वार्थी हेतूंसाठी दहशतवादाचा वापर करत आहेत, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. काही देश सीमेपलीकडून दहशतवादाला एक धोरण म्हणून वापरत आहेत. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. अशा दुटप्पी भूमिकेला कुठलंही स्थान असता कामा नये. तसेच एससीओने अशा देशांचा निषेध करण्यासाठी कुठलीही शंका बाळगता कामा नये.
यावेळी राजनाथ सिंह यांनी दहशतवादाविरोधातील भारताची भूमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले की, दहशतवादाविरोधात भारताचं धोरंण त्याच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. यामध्ये दहशतवादाविरोधात स्वत:चं संरक्षण करण्याच्या आमच्या अधिकाराचाही समावेश आहे. दहशतवादाची केंद्रं कुठे आहेत हे आम्ही दाखवून दिले आहे. दहशतवादाची ही केंद्र आता सुरक्षित नाही आहेत. तसेच आम्ही त्यांना लक्ष्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले.