ऑनलाइन लोकमत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवी दिल्ली, दि. १२ - ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तीच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत असल्याचे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लोकं फक्त फोटो काढण्यापुरतेच साफसफाई करतात असा चिमटाही त्यांनी भाजपा नेत्यांना काढला आहे.
जवाहरलाल नेहरु यांच्या १२५ व्या जयंती निमित्त दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर स्टेडियमवर काँग्रेसतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर तिखट शब्दात टीका केली. तापट स्वभावाची लोकं देशावर राज्य करत असून अशा लोकांशी लढा करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. आमच्या हातून काही चुका घडल्या पण आम्ही विचारधारेचा त्याग कधीच केला नाही असेही राहुल गांधी यांनी नमूद केले. तर नेहरुजी नेहमची सर्वांना एकत्र घेऊन चालायाचे, पण दुर्दैवाने आता त्यांच्या विचारधारेला संपवण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. लागोपाठ झालेल्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी सोनिया गांधी म्हणाल्या, आज नेहरु असते तर त्यांनी तुम्हाला एकत्र या, लोकांमध्ये जा व त्यांच्या सुखदु:खाचे साथीदार व्हा असे आवाहन त्यांनी केले असते.