ईशान्येकडील भागात पुरामुळे लाखो लोक अडचणीत आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये ५.५ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. ईशान्येकडील भागात पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेशात १०, मेघालयात सहा, मिझोराममध्ये पाच, सिक्कीममध्ये तीन आणि त्रिपुरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. रिपोर्टनुसार, १५ नद्यांना पूर आला आहे. सिक्कीममधील छातेन येथील लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जवान बेपत्ता आहेत, असं संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं.
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी सर्वात जास्त नुकसान झालेल्या लखीमपूर जिल्ह्याला भेट दिली आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये बहुतेक ठिकाणी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुरामुळे लाखो लोकांना फटका
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, २२ जिल्ह्यांतील ६५ महसूल क्षेत्र आणि १२५४ गावांमधील ५१५०३९ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. सर्वात जास्त प्रभावित जिल्हा श्रीभूमी आहे, जिथे १९४१७२ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, त्यानंतर कछार जिल्ह्यात ७७९६१ लोक आणि नागावमध्ये ६७८८० लोक आहेत.