No Toll Fees for 2-Wheelers: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या केवळ अफवा असून दुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
एनएचएआयच्या नवीन तरतुदींनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल कर भरावा लागेल. टोल भरण्याचे टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा फास्टॅग न वापरणाऱ्या दुचाकीस्वारकडून २ हजारांचा दंड आकारला जाईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत दाखवल्या जात आहेत. यावर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली असून या केवळ अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, "काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो."