'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:42 IST2025-06-20T14:42:17+5:302025-06-20T14:42:41+5:30

Narendra Modi in Bihar: 'देशाने गरीबी हटावचे बरेच नारे ऐकले. आमच्या सरकारने गरिबी कमी करुन दाखवली. गेल्या दशकात २५ कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली. जागतिक बँकेने याचे कौतुक केले.'

Narendra Modi in Bihar: 'Only family support, family development', PM Modi's scathing criticism of Congress-RJD from Bihar | 'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

Narendra Modi in Bihar: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांनी सिवान येथून राज्यासाठी पाणी, रेल्वे आणि वीज क्षेत्रासह १० हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटन केले. सिवानमधील रॅलीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'हे सर्व विकास प्रकल्प बिहारला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील. आम्ही दाखवून दिले की, गरिबी कमी करता येते. जागतिक बँकदेखील भारताची प्रशंसक बनली आहे.'

पंतप्रधान पुढे म्हणाले, 'मी कालच परदेशातून परतलो आहे. या दौऱ्यादरम्यान मी अनेक नेत्यांशी बोललो. सर्व नेते भारताच्या विकासाने खूप प्रभावित झाले आहेत. ते भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनताना पाहत आहेत. बिहार यामध्ये खूप मोठी भूमिका बजावणार आहे.'

काँग्रेस-राजदवर निशाणा
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, 'मी बिहारच्या लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो आहे. पंजा आणि कंदीलवाल्या लोकांनी मिळून बिहारच्या अभिमानाला धक्का पोहोचवला आहे. या लोकांनी मिळून राज्याला इतके लुटले की, गरिबी बिहारचे दुर्दैव बनले. अनेक आव्हानांवर मात करुन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले आहे.  आम्ही राज्यासाठी खूप काही केले, करत आहोत आणि पुढेही करत राहू. गेल्या १० वर्षांत बिहारमध्ये ५५ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधले गेले आहेत. १.५ कोटींहून अधिक घरांना वीज मिळाली आहे. १.५ कोटी लोकांना पाण्याचे कनेक्शन दिले आहे.'

जागतिक बँकने प्रशंसा केली    
पंतप्रधान म्हणाले, 'आपल्या देशाने गरीबी हटावचे बरेच नारे ऐकले, पण जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली, आमच्या सरकारने दाखवून दिले की, गरिबी कमी करता येते. गेल्या दशकात, विक्रमी २५ कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे. जागतिक बँकेसारख्या जगातील नामांकित संस्था भारताच्या या कामगिरीचे कौतुक करत आहेत. काँग्रेस आणि राजदच्या राजवटीत गरिबांना घरे मिळाली नाहीत, उपचार नव्हते, शिक्षण नव्हते, वीज नव्हती, गॅस कनेक्शन नव्हते, नोकऱ्या नव्हत्या. गरिबी हटवण्याचे स्वप्न दाखवून त्यांचे स्वतःचे कुटुंब करोडपती झाले'

तुमच्यासाठी काम करत राहील..
आपल्या पक्षाच्या यशाचे मोजमाप करताना पंतप्रधान म्हणाले, '४ कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. सिवानमध्ये १ लाखाहून अधिक लोकांसाठी कायमस्वरूपी घरे बांधण्यात आली आहेत. आमचे सरकार मोफत रेशन, वीज आणि पाण्याची सुविधा देखील देत आहे. मी तुमच्यासाठी काम करत राहील, कधीही निष्क्रिय बसणार नाही. बिहारमधील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. आम्ही 'सबका साथ, सबका विकास' या मार्गावर चालत आहोत. कंदीलवाले लोक 'परिवार का साथ परिवार का विकास' असे म्हणतात,' अशी खोचक टीकाही पीएम मोदींनी यावेळी केली. 

Web Title: Narendra Modi in Bihar: 'Only family support, family development', PM Modi's scathing criticism of Congress-RJD from Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.