"मोदी सरकार देशाची परराष्ट्र नीती उद्ध्वस्त करतंय..."; इराणच्या 'इरिस डेना' जहाजावरून मल्लिकार्जुन खर्गे भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:10 IST2026-03-05T19:09:38+5:302026-03-05T19:10:10+5:30
हिंदी महासागरात अमेरिकन पाणबुडीने इराणचे जहाज बुडवल्यानंतर भारत सरकारने बाळगलेल्या मौनावर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, ही चुप्पी देशाच्या धोरणात्मक आणि राष्ट्रीय हितांकडे केलेले दुर्लक्ष असल्याचे म्हटले आहे.

"मोदी सरकार देशाची परराष्ट्र नीती उद्ध्वस्त करतंय..."; इराणच्या 'इरिस डेना' जहाजावरून मल्लिकार्जुन खर्गे भडकले
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक राजकारणासोबतच देशांतर्गत राजकारणही तापले आहे. हिंदी महासागरात अमेरिकन पाणबुडीने इराणचे जहाज बुडवल्यानंतर भारत सरकारने बाळगलेल्या मौनावर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, ही चुप्पी देशाच्या धोरणात्मक आणि राष्ट्रीय हितांकडे केलेले दुर्लक्ष असल्याचे म्हटले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "जे 'इरिस डेना' हे इराणी जहाज टारपीडोच्या हल्ल्यात बुडाले, ते कोणत्याही लष्करी सामग्रीशिवाय होते. विशेष म्हणजे, हे जहाज विशाखापट्टणम येथे १५ ते २६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू २०२६' साठी भारताचे आमंत्रित अतिथी म्हणून आले होते. ७० हून अधिक देशांच्या सहभागासह झालेल्या या कार्यक्रमातून परतणाऱ्या अतिथी जहाजाच्या विनाशावर भारताने साधी संवेदनाही व्यक्त करू नये, हे आश्चर्यकारक आहे." एवढेच नाही तर, "पंतप्रधान मोदी जेव्हा स्वतःच्या अंगणात घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी हिंदी महासागर क्षेत्रातील 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' होण्यावर उपदेश देऊ नये," असेही खर्गे म्हणाले.
आखाती देशांतील १ कोटी भारतीयांची सुरक्षा आणि तेथील विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारकडे काय योजना आहे? असा सवालही खर्गे यांनी यावेळी उपस्थित केला. मोदींचे हे 'आत्मसमर्पण' भारताच्या मूळ राष्ट्रीय हितांचा अपमान करणारे असून, वर्षानुवर्षे जपलेली परराष्ट्र नीती यामुळे उद्ध्वस्त होत आहे, अशी टीका खरगे यांनी केली आहे.