Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:10 IST2026-04-04T12:09:11+5:302026-04-04T12:10:57+5:30
Mithun Chakraborty : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आणि बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती जोमाने कामाला लागले आहेत.

Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते आणि बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती जोमाने कामाला लागले आहेत. "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत कोणीही पश्चिम बंगालला बांगलादेश बनवू शकत नाही" असं म्हणत मिथुन यांनी 'एसआयआर' (SIR) आणि मतदार यादीतील वादावरून तृणमूल काँग्रेसवर (TMC) निशाणा साधला. स्थानिक उमेदवारांना तिकीट देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं असून विजयासाठी हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. घुसखोरी हा मोठा मुद्दा असल्याचं सांगत मिथुन म्हणाले की, यामुळे स्थानिक लोकांच्या, विशेषतः मुस्लिम समाजाच्या रोजगार आणि हक्कांवर गदा येत आहे.
AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांचं कौतुक करताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ते मला खूप आवडतात, ते सुशिक्षित आहेत आणि उत्तम बोलतात. ओवैसी साहेब एक 'रिअल लीडर' आहेत. भाजपा मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर भाजपा अशा लोकांच्या विरोधात आहे जे भारतात राहून भारताचं नुकसान करू इच्छितात. भाजपाच्याही अनेक लोकांची नावं मतदार यादीतून हटवली गेली आहेत. मदरशांना ५७१३ कोटी रुपये दिले गेले. बंगालमध्ये सध्या इतकी घाण पसरली आहे की, ती झाडू घेऊन साफ करावी लागेल.
“आमचा विजय निश्चित”
पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकीवर बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी पक्षाची रणनीती आणि जमिनी स्तरावरील कामावर विश्वास व्यक्त केला. स्थानिक उमेदवारांना रिंगणात उतरवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना ते म्हणाले की, या निर्णयामुळे विजयाची शक्यता वाढेल. यावेळी आम्ही स्थानिक व्यक्तीची निवड केली आहे, मग तो निर्णय चांगला असो वा वाईट. जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल, तर आपण स्थानिक व्यक्तीलाच संधी देऊ, जेणेकरून तो निवडून येईल. याच आशेने मी सांगू शकतो की, आमचा विजय निश्चित आहे.
“राज्यातील घुसखोरी ही गंभीर चिंतेची बाब"
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित केलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर त्यांनी सहमती दर्शवली. राज्यातील घुसखोरी ही आजही गंभीर चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. हा मुद्दा स्थानिक समुदायांवर, विशेषतः मुस्लिम नागरिकांवर परिणाम करत असल्याचं ते म्हणाले. रोजगार आणि कल्याणकारी योजनांच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, "आमच्या बंगालमधील मुस्लिम समाजातील लोक वाईट रितीने प्रभावित होत आहेत, कारण त्यांना जे रोजगार मिळायला हवेत ते मिळत नाहीत. केंद्र सरकारकडून आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींसाठी ज्या सोयी-सुविधा दिल्या जातात, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत."