Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:13 IST2025-10-06T06:03:52+5:302025-10-06T06:13:50+5:30
Jaipur SMS Hospital Fire: शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
Jaipur SMS Hospital Fire: राजस्थानची राजधानी जयपूरमधील सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा गुदमरून आणि होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेत ५ रुग्ण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये अचानक आगीच्या ज्वाळा भडकल्या. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण वॉर्ड धुराच्या लोटात वेढला गेला. यावेळी आयसीयूमध्ये ११ गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी धावपळ करत रुग्णांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
रुग्णांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आयसीयूमधील रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही रुग्णांना तर बेडसहित ऑक्सिजन सिलेंडरसह बाहेर आणण्यात आले. या धावपळीत रुग्णालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
६ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू, ५ जण गंभीर
या दुर्दैवी घटनेत आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. धुरामुळे श्वास गुदमरल्याने आणि आगीच्या झळा बसल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, ५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून घटनेची पाहणी आणि चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृत रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि जखमींच्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच, जखमी रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.