Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:02 IST2026-04-07T15:59:51+5:302026-04-07T16:02:13+5:30
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

फोटो - आजतक
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे राज्यातील शांतता पुन्हा एकदा भंग पावली आहे. वाढता तणाव पाहता प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे, तर अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
मोइरांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रोंगलाओबी अवांग लेइकाई येथे हा हल्ला रात्री १ च्या सुमारास झाला. कुकी उग्रवाद्यांनी डागलेलं एक रॉकेट थेट एका घरावर पडलं. या स्फोटात एका ५ वर्षांच्या मुलाचा आणि अवघ्या ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही मुलांना रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
संतप्त नागरिकांची रस्त्यावर निदर्शनं
या घटनेनंतर खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये तणाव वेगाने वाढला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली आणि बिष्णुपूर जिल्ह्यात डांबर वाहून नेणारे दोन टँकर आणि लोखंडी सळ्यांनी भरलेला एक ट्रक पेटवून दिला. ही वाहनं चुराचांदपूर जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
निदर्शकांनी मोइरांग पोलीस ठाण्याबाहेर जमा होऊन प्रशासनाकडून तातडीची कारवाईची मागणी केली. परिस्थिती तेव्हा अधिक बिघडली, जेव्हा एका मोठ्या जमावाने बिष्णुपूर आणि चुराचांदपूर सीमेजवळील पी. जेलमोल टेकड्यांनजीक असलेल्या सीआरपीएफ (CRPF) कॅम्पवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात १९ जण जखमी
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांना गोळीबार आणि स्मोक बॉम्बचा वापर करावा लागला. या दरम्यान किमान १९ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे.
वाढता तणाव लक्षात घेता प्रशासनाने बिष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लावला आहे, तर पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा तीन दिवसांसाठी खंडित केली आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून स्फोट आणि हिंसाचाराचा तपास सुरू आहे.