कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात उन्नावहून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 25 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे यात्रेकरू उन्नावमधील बक्सर येथील चंद्रिका देवी मंदिराचे दर्शन करून आपल्या गावी कोरथा येथे परतत असताना साढ पोलीस स्टेशन हद्दीतील गौशाळेजवळ ही ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ जवळच्या सीएचसी रुग्णालयात दाखल आले. या ठिकाणी 24 जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतर गंभीर जखमी यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करताना, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. यासोबतच त्यांनी खादी आणि ग्रामोद्योग मंत्री राकेश सचान आणि अजित पाल यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची पंतप्रधान मदत निधीतून मदत जाहीर केली. नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट केले आहे.