'जस्टीस लोया खूनाचा नीट तपास केला नाही त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:10 PM2019-12-04T12:10:18+5:302019-12-04T12:11:18+5:30

त्यांचा खून का झाला? ही चौकशी झाली पाहिजे.

Justice Loya murder not investigated properly, so the matter should be investigated again Demand By Hussen Dalwai | 'जस्टीस लोया खूनाचा नीट तपास केला नाही त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी'

'जस्टीस लोया खूनाचा नीट तपास केला नाही त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी'

Next

मुंबई - नागपूर येथील गाजलेले न्या. लोया यांच्या मृत्युप्रकरणी काँग्रेस नेते हुसने दलवाई यांनी मोठी मागणी केली आहे. जस्टीस लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी. लोया यांचा खून कसा झाला याचा नीट तपास झाला पाहिजे. ही चौकशी व्यवस्थित झाली नाही असा आरोप त्यांनी केली आहे. 

याबाबत हुसेन दलवाई यांनी सांगितले की, न्या. लोया यांच्या खूनाचा तपास नीट केला नाही. त्यांचा खून का झाला? ही चौकशी झाली पाहिजे. या खूनामध्ये दहशतवादी संघटनेने तसेच विशिष्ट विचारधारेचा समावेश आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे 10 वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन दिवसांपूर्वी फेटाळली आहे. अ‍ॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर शरद पवारांनीही भाष्य केलं होतं. जर, मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी, असं शरद पवार यांनी म्हटलंय. 

जस्टीस लोया प्रकरणाबाबत मला जास्त माहिती नाही, मी केवळ वर्तमानपत्रात काही लेख वाचले आहेत. हे लेख वाचल्यानंतर, या प्रकरणाची मूळापर्यंत जाऊन चौकशी केली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रात अनेक लोकांची आहे. माझ्याजवळ यासंदर्भात डिटेल्स माहिती नाही. पण, मागणी होत असेल तर सरकारने याबाबत विचार केला पाहिजे. या चौकशीची मागणी करणारे कुठल्या आधारे मागणी करत आहेत. यामध्ये काय तथ्य आहे, याची चौकशी केली पाहिजे. जर काही आढळलं तर रिइन्व्हेस्टीगेशन करायला पाहिजे. मात्र, काहीच नसेल तर एखाद्याविरुद्ध आरोप लावण्यासाठी असं करणंही चुकीचं आहे, असं मत पवार यांनी जस्टीस लोया प्रकरणावर दिलं आहे. 

न्या. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन चकमक खटल्याची जबाबदारी होती. त्यावरून त्यांना सतत धमक्या दिल्या जात होत्या. तसेच, त्यातूनच मार्च-2015 मध्ये एका गुप्त बैठकीत त्यांना रेडिओअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप करत याप्रकरणाच्या चौकशीची मागणी  सतिश उके यांनी केली होती. तर, वर्तमानपत्रातही जस्टीस लोयांच्या मृत्यूच्या संशयासंदर्भात अनेक लेख छापून आले आहेत. पण, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआय न्यायालयाचे न्या. बी.एच. लोया यांचा नागपूरमध्ये हृदयक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू झाला, याविषयी संशय घ्यायला जागा नाही, अशी ग्वाही देऊन या मृत्यूचा निष्पक्ष तपास करण्यासाठी आलेल्या चारही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या प्रकरणात भाजपाध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही आरोपी होते. लोया यांच्या मृत्यूनंतर आलेल्या न्यायाधीशांनी त्यांना आरोपमुक्त केले. लोया यांच्या मृत्यूचा शहा यांच्या आरोपमुक्तीशी संबंध नसावा ना, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. 
 

Web Title: Justice Loya murder not investigated properly, so the matter should be investigated again Demand By Hussen Dalwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.