...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 08:27 PM2023-12-11T20:27:58+5:302023-12-11T20:28:56+5:30

'जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले.'

Jammu-Kashmir Article 370: the whole of Pok would be part of India today; Amit said history by taking Nehru's name | ...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला

...तर आज संपूर्ण Pok भारताचा भाग असता; नेहरुंचे नाव घेत अमित शहांनी इतिहास काढला

Jammu-Kashmir Article 370: आज राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंवर निशाणा साधला. शहा यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, जर अवेळी युद्धविराम झाला नसता, तर आज पीओकेची घटना घडली नसती. जवाहरलाल नेहरू दोन दिवस थांबले असते, तर संपूर्ण पीओके तिरंग्याखाली आला असता.

सत्य बाहेर येतेच...
कलम 370 वर बोलताना अमित शहा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर हैदराबादमध्ये काश्मीरपेक्षाही मोठी समस्या होती, नेहरू तिथे गेले नाहीत. नेहरू जुनागड, लक्षद्वीप, जोधपूर येथे गेले नाहीत. त्यांनी फक्त काश्मीरचे काम पाहिले आणि तेही अर्धवट सोडले. काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर का झाला? इतिहास 1000 फूट खाली गाडला गेला तरी सत्य बाहेर येते.

विलीनीकरणादरम्यान एका व्यक्तीला विशेष स्थान देण्याची विनंती करण्यात आली होती आणि ती म्हणजे शेख अब्दुल्ला, त्यामुळे विलिनीकरणाला विलंब झाला. एवढ्या राज्यांचे विलीनीकरण झाले, पण कुठेही कलम 370 का लागू केले नाही. ही अट कोणी घातली आणि ती कोणी मान्य केली, याचे उत्तर देशातील जनतेला द्यावे लागेल. या प्रश्नापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, अशी टीका शहांनी केली.

सरदार पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी सैन्य पाठवले...
1947 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्यास दोन दिवसांचा विलंब झाला. सरदार वल्लभभाई पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले. हे मी म्हणत नाहीय, तर नेहरू मेमोरिअलमधील पुस्तकात नेहरुंनीच काश्मीरमध्ये झालेली चूक मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्रात जाण्याची चूक त्यांनी केली. चुकीच्या कलमाखाली संयुक्त राष्ट्रात गेले, त्यामुळे नुकसान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये ठराविक कुटुंबं सरकार चालवत होती, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हा हिंदू-मुस्लिमचा विषय नाही
काँग्रेसवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, पराभवात विजय शोधण्याची कला काँग्रेसकडून शिकली पाहिजे. आज सुप्रीम कोर्टाने कलम 370 हटवल्याचा निर्णय योग्य ठरवला, पण काँग्रेस तो निर्णय चुकीचा ठरवत आहे. काँग्रेसला वास्तव समजून घ्यावे लागेल, हा हिंदू-मुस्लिमाचा विषय नाही. काश्मीरपेक्षा गुजरात, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, पण तिथे फुटीरतावाद नव्हता. काश्मीरमध्ये कलम 370 असल्यामुळे फुटीरतावाद तयार झाला. फुटीरतावादामुळेच तिथे दहशतवाद फोफावला, असंही शहा यावेळी म्हणाले. 

Web Title: Jammu-Kashmir Article 370: the whole of Pok would be part of India today; Amit said history by taking Nehru's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.