Iran War: सर्वोच्च नेता निवडीनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 08:00 IST2026-03-11T07:59:50+5:302026-03-11T08:00:46+5:30
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इराणचा सर्वोच्च नेता निवडण्यात आल्यानंतर भारताकडून पहिल्यांदाच संपर्क करण्यात आला.

Iran War: सर्वोच्च नेता निवडीनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल लष्करी संघर्ष पेटलेला असतानाच भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना कॉल केला. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासोबत जयशंकर यांची युद्धाबद्दल नव्याने घडत असलेल्या घटनांबद्दल आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून जयशंकर यांनी तीन वेळा फोनवरून चर्चा केली आहे. मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर भारताकडून पहिल्यांदाच चर्चा करण्यात आली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सोशल मीडियावरुन माहिती देताना एस. जयशंकर म्हणाले की, "आज सायंकाळी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासोबत सध्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दल नवीन घडामोडींविषयी सविस्तर चर्चा केली. एकमेकांच्या संपर्कात राहूयात, यावर दोन्ही देश सहमत झाले."
एस. जयशंकर आणि अराघची यांच्यात यापूर्वी दोनवेळा फोनवरून चर्चा झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी, ज्यादिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर पहिला हल्ला केला. त्यानंतर ५ मार्च रोजी दोन्ही नेत्यांनी फोनवरून चर्चा केली होती.
सर्वोच्च नेता निवडीनंतर पहिल्यांदा संपर्क
अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते पद रिक्त झाले होते. मोजतबा खामेनेई यांची निवड सर्वोच्च नेते पदी करण्यात आली. त्यानंतर भारताने पहिल्यादा इराणशी चर्चा केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीतून तेलाची वाहतूक जवळपास अडकली आहे. त्यामुळे अनेक देशांना तेल आणि गॅस तुटवड्याच्या झळा बसत असतानाच भारताने इराणसोबत संवाद साधला.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबरच एस. जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहन वादेफए आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चोह यन यांच्याशीही फोनवरून चर्चा केली.
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरू झाल्यानंतर तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरठवड्यावर परिणाम झाला आहे. भारतात गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून, केंद्र सरकारकडून काही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.