"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 08:37 IST2025-06-04T08:36:04+5:302025-06-04T08:37:41+5:30
इंदूरचे बिझनेसमन राजा रघुवंशी यांचा मृतदेह शिलाँगमध्ये सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजा त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेले होते.

"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
इंदूरचे बिझनेसमन राजा रघुवंशी यांचा मृतदेह शिलाँगमध्ये सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. राजा त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेले होते. हे कपल अचानक गायब झालं होतं. आता ११ दिवसांनंतर त्यांचा मृतदेह जंगलात सापडला. मात्र त्यांची पत्नी सोनम अजूनही बेपत्ता आहे. शिलाँग पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि इंदूर पोलीसही सतत संपर्कात आहेत.
इंदूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या पहिल्या दिवसापासून शिलाँग पोलिसांशी समन्वय साधला जात आहे आणि प्रत्येक अपडेट घेतली जात आहे. सोनमला शोधण्यासाठी शिलाँग पोलिसांनी एक विशेष पथकही तयार केलं आहे. या संपूर्ण प्रकरणादरम्यान, आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोनम आणि तिची सासू उमा रघुवंशी यांच्यातील संभाषण आहे.
उमा त्यांच्या सून विचारतात की, "बेटा, तुम्ही कसे आहात? मी साबुदाणा खिचडी बनवली होती म्हणून मला तुझी आठवण आली, आज तुझं व्रत आहे ना?" यावर सोनम उत्तर देत "हो आई, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की मी फिरण्याच्या नादात माझा व्रत तोडणार नाही. इथे खाण्यापिण्यासाठी काही खास नाही. मी एका ठिकाणी कॉफी प्यायले पण मला आवडली नाही" असं म्हटलं.
"तुम्ही आता कुठे आहात?" असं सासूने विचारलं. तेव्हा "आई, हे मला जंगलात घेऊन आले आहेत. वर चढणं खूप कठीण आहे, मला श्वास घेण्यास त्रास होत आहे. आम्ही धबधबा पाहण्यासाठी आलो होतो. मी तुमच्याशी नंतर बोलेन" असं सोनम म्हणाली. यावर "ठीक आहे बेटा, फोन कनेक्ट झाला, आता माझं मन शांत झालं" असं म्हणत सासून फोन ठेवला. हे शेवटचं संभाषण होतं ज्यानंतर दोघेही पती-पत्नी बेपत्ता झाले.
शिलाँग पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. राजा रघुवंशी यांचे शिलाँगमध्ये शवविच्छेदन करण्यात आलं आहे आणि जर कुटुंबाला इंदूर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर पोलीस तयार आहेत असं अमित सिंह म्हणाले. राजा रघुवंशी यांचे कुटुंबीय संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणं आहे की, हा केवळ अपघात नाही तर त्यामागे काहीतरी कट रचलेला असू शकतो.