"PM मोदींनी एक कॉल केला तर युद्ध थांबू शकते", इराण-इस्रायल संघर्षावर UAEच्या माजी उच्चायुक्तांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 07:53 IST2026-03-10T07:51:11+5:302026-03-10T07:53:29+5:30
PM Modi Iran War: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष दिवसेंदिवस वाढत असताना संयुक्त अरब अमिरातीच्या माजी उच्चायुक्तांनी एक मोठं विधान केले आहे.

"PM मोदींनी एक कॉल केला तर युद्ध थांबू शकते", इराण-इस्रायल संघर्षावर UAEच्या माजी उच्चायुक्तांचे विधान
इस्रायल-अमेरिकेने इराणवर हल्ला करत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांची हत्या केल्यानंतर मध्य पूर्वेत संघर्षाचा भडका उडाला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. मध्य पूर्वेतील हा युद्ध संघर्ष वाढत असतानाच संयुक्त अरब अमिराती देशाचे माजी उच्चायुक्त हुसैन हसन मिर्झा यांनी भारताच्या मध्यस्थीबद्दल मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कॉल केला तर इस्रायल आणि इराणमध्ये जो संघर्ष सुरू आहे, तो थांबवण्यास मदत होऊ शकते, असे ते म्हणाले.
हुसैन हसन मिर्झा हे संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त राहिलेले आहेत. आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "भारत एक महान देश आहे. भारताबद्दल बोलायचं तर... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक कॉल इस्रायल आणि इराण या दोघांतील संघर्ष थांबण्यास पुरेसा आहे. फक्त एक फोन कॉल."
मोदींच्या एका कॉलमुळे संघर्षावर तोडगा निघू शकतो
"पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिकडेच इस्रायल दौऱ्यावर गेले होते आणि इराणसोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत. मोदी १० दिवसांपूर्वीच इस्रायलमध्ये होते. भारत इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे खूप सोप्प आहे. पंतप्रधान मोदींच्या एका कॉलमुळे या संघर्षावर तोडगा निघू शकतो", असे यूएईचे माजी उच्चायुक्त मिर्झा म्हणाले.
भारत राजनैतिक पद्धतीने हात घालेल
हुसैन हसन मिर्झा याच मुद्द्यावर बोलताना पुढे म्हणाले की, "मला आशा आहे की, भारत या मुद्द्याला राजनैतिक मार्गाने हात घालेल. कारण यूएईमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. यूएईमध्ये जवळपास ३५ लाख भारतीय राहतात. यूएईने आपल्या भूमीमध्ये कधीही इराणविरोधात कारवाया करण्याची परवानगी दिली नाही. कुवैत आणि कतारसारखे दुसऱ्या आखाती देशांनीही आपल्या भूमीतून इराणवर हल्ला करण्याची परवानगी दिलेली नाही."
तेहरानमध्ये २० मोठे हल्ले
अमेरिका-इस्रायलने सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान मध्यरात्री इराणची राजधानी हवाई हल्ल्यांनी हादरवून टाकली. आतापर्यंतचा सर्वात भयंकर हल्ला या दोन्ही देशांनी केला. इराणची राजधानी तेहरानमध्ये २० पेक्षा जास्त स्फोट झाले.
तेहरानच्या पश्चिम भागात झालेल्या या हल्ल्यात जवळपास अर्धा तास बॉम्ब वर्षाव करणाऱ्या विमानांचा आवाज ऐकू येत होता. या हल्ल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणची संपूर्ण सैना उद्ध्वस्त झाली आहे आणि आता युद्धाचा शेवट जवळ आला आहे. दुसरीकडे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने म्हटले आहे की, यु्द्धाचा शेवट आता आम्ही करू.