पीएम मोदी संसदेत आले असते, तर अनुचित प्रकार घडला असता; ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:12 IST2026-02-05T16:12:22+5:302026-02-05T16:12:58+5:30
'काल विरोधकांनी जो काही गोंधळ घातला, तो संसदेच्या इतिहासावर लागलेला काळा डाग आहे.'

पीएम मोदी संसदेत आले असते, तर अनुचित प्रकार घडला असता; ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल(4 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलणार होते. मात्र, सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे, पंतप्रधानांचे भाषण पुढे ढकलण्यात आले. आता या सर्व घडामोडीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाभोवती घेराव घातल्यामुळेच आपण पंतप्रधानांना सभागृहात न येण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहात काय झालं?
आज (5 फेब्रुवारी 2026) लोकसभेचे कामकाज स्थगित होण्यापूर्वी अध्यक्ष बिर्ला यांनी सभागृहात सांगितले की, काल सभागृहात नेमकं काय घडलं, हे संपूर्ण देशाने पाहिले. कालची घटना संसदेच्या इतिहासावर लागलेला एक काळा डाग आहे. काही खासदारांनी थेट पंतप्रधानांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या बाबतीत काहीही अनपेक्षित घडू शकले असते. याच कारणामुळे आपण पंतप्रधान मोदींना सभागृहात न येण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.
Before the House was adjourned for the day, Lok Sabha Speaker Om Birla today said, "The country saw what happened in the House yesterday. Everyone saw how the MPs approached the PM's chair in the House. I got information that any mishap could have happened. To ensure that such a… pic.twitter.com/itas47E1Bk
— ANI (@ANI) February 5, 2026
सभागृहात जाणूनबुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न
लोकसभा अध्यक्ष पुढे म्हणाले, काही खासदारांनी तर लोकसभा चेंबरमध्ये प्रवेश करून गोंधळ घातला. आपल्या संसदीय व्यवस्थेत संविधानाने सभापतींच्या पदाला आदराचे स्थान दिले आहे. राजकीय मतभेद व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरील पद्धत संसदेत आणल्या जाऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काल पंतप्रधानांचे भाषण टळले
काल (4 फेब्रुवारी 2026) पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देणार होते. मात्र, विरोधी पक्षातील काही महिला खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यामुळे लोकसभा उपसभापती संध्या राय यांनी कामकाज स्थगित केले.
रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका
भाजपाचा आरोप: पंतप्रधानांच्या खुर्चीकडे धाव
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, विरोधी पक्षातील अनेक महिला खासदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरल्या आणि पंतप्रधानांच्या खुर्चीकडे पुढे सरकल्या. आमच्या वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांना वारंवार समजावले की, पंतप्रधान येणार आहेत, कृपया आपल्या जागी परत जा; पण त्याकडे दुर्लक्ष केले. सभागृहातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पंतप्रधान मोदी सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
VIDEO | Delhi: “Absolute lie, no question of hurting PM; PM is hiding behind the Speaker; he did not have the guts to come to the House because three women were standing before the bench”, says Congress MP Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) on Lok Sabha Speaker saying he… pic.twitter.com/4HYy3oXlsL
— Press Trust of India (@PTI_News) February 5, 2026
प्रियंका गांधींची टीका
पंतप्रधान मोदी सभागृहात भाषणासाठी आले नाही, यावर बोलताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी म्हणाल्या, पंतप्रधान अध्यक्षांच्या मागे लपले आहेत. काल तीन महिला समोर उभ्या होत्या म्हणून त्यांच्यात सभागृहात येण्याची हिंमत नव्हती. हा काय मूर्खपणा आहे? कोणतीही चर्चा होत नाहीये, कारण सरकारला चर्चा होऊ द्यायची नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधानांच्या खुर्चीकडे कोण पोहोचले होते?
पंतप्रधानांच्या खुर्चीवर पोहोचलेल्या महिला खासदारांची नावेही उघड झाली आहेत. यामध्ये आर. सुधा, ज्योतिमणी, वर्षा गायकवाड, गेन बेन ठाकोर, के. काव्या आणि शोभा बच्छाव यांचा समावेश आहे.