'मी निर्दोष, हे तर राजकीय षडयंत्र'; सुल्तानपूर कोर्टात राहुल गांधी कडाडले, 'त्या' वक्तव्यावर दिली मोठी साक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:35 IST2026-02-20T13:34:04+5:302026-02-20T13:35:04+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली होती.

'मी निर्दोष, हे तर राजकीय षडयंत्र'; सुल्तानपूर कोर्टात राहुल गांधी कडाडले, 'त्या' वक्तव्यावर दिली मोठी साक्ष!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्हा न्यायालयात हजेरी लावली. भाजप नेते अमित शाह यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आपला जबाब नोंदवला. "माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून हा खटला पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे," अशा शब्दांत राहुल गांधींनी न्यायालयात आपली बाजू मांडली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण ऑक्टोबर २०१८ मधील आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली होती. "भाजप स्वच्छ राजकारणाचे दावे करते, मात्र त्यांचे अध्यक्ष एका हत्येच्या खटल्यातील आरोपी आहेत," असे विधान राहुल यांनी केले होते. या विधानामुळे भाजपची बदनामी झाल्याचा दावा करत सुल्तानपूरचे भाजप नेते विजय मिश्रा यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
कोर्टात काय घडलं?
शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास राहुल गांधी कडक सुरक्षेत सुल्तानपूर न्यायालयात पोहोचले. सुमारे अर्धा तास ते कोर्टरुममध्ये होते. सीआरपीसी ३१३ अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. राहुल गांधींचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "राहुल गांधींनी न्यायाधीशांसमोर स्पष्टपणे सांगितले की ते या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहेत. विरोधकांना त्रास देण्यासाठी राजकीय द्वेषातून हा खटला दाखल करण्यात आला आहे."
९ मार्च रोजी पुढची सुनावणी
या प्रकरणातील पुराव्यांची छाननी आणि पुढील प्रक्रियेसाठी न्यायालयाने आता ९ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. राहुल गांधींना यापूर्वी फेब्रुवारी २०२४ मध्ये या प्रकरणात जामीन मंजूर झाला होता, मात्र आजची हजेरी ही त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
लखनौमार्गे दिल्लीला रवाना
कोर्टातील कामकाज आटोपल्यानंतर राहुल गांधी प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्यासह लखनौकडे रवाना झाले. तिथून ते विमानाने दिल्लीला परतणार आहेत. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे सुल्तानपूर परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.