अलमट्टी धरण ५२४ मीटरपर्यंतच; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर कायमचा तोडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:22 IST2026-03-31T16:22:03+5:302026-03-31T16:22:26+5:30
आमदार लक्ष्मण सवदी : सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांवर कोणताही परिणाम होणार नाही

अलमट्टी धरण ५२४ मीटरपर्यंतच; उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर कायमचा तोडगा
अथणी : अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास सरकारने अनुमती दिली असून, एवढे पाणी साठवल्यानंतर महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट या निर्णयामुळे उन्हाळ्यातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार लक्ष्मण सवदी यांनी दिली.
अथणी-अभ्याळ संपर्क रस्ता तसेच दरूर-खवटगोप या दोन कोटी रुपये खर्चाच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते दरूर येथे बोलत होते. सवदी म्हणाले, उन्हाळ्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी अलमट्टी धरणाजवळील गलगली पाणीपुरवठा योजनेद्वारे पाइपलाइनने पाणी हिप्परगी धरणात सोडण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठीही सरकारच्या निदर्शनास बाब मांडली आहे.
“कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणी साठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय उन्हाळ्यातील पाण्याची समस्या दूर होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. सीमाभागातील रस्त्यांच्या विकासाबाबत बोलताना सवदी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर डांबरीकरणाची कामे झाली असून एकही रस्ता कच्चा राहू नये, यासाठी प्रशासन दक्ष आहे.
अभ्याळ रस्त्यासाठी तीन कोटी साठ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून रस्ता दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य विनायक बागडी, कॉन्ट्रॅक्टर राजू अलबाळ, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष भरत माने, अण्णासाहेब माने, विजय वाघमारे, शंकर अवघडे, शिवरुद्र घुळानावर आदी उपस्थित होते.