...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 06:44 IST2026-03-27T06:43:40+5:302026-03-27T06:44:39+5:30
पश्चिम आशिया हा भारताच्या तेल, वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/तेहरान : इराणनेभारतासह चीन आणि रशियासारख्या काही मित्र देशांना व्यापारी जहाज वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करण्यास परवानगी दिली असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी गुरुवारी सांगितले. यामुळे भारतावर आलेल्या इंधन टंचाईच्या संकटातून दिलासा मिळणार आहे.
पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान अरुंद जलमार्ग असलेल्या होर्मूझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची (एलएनजी) वाहतूक होते. इराणने या मार्गातून प्रवास करण्यावर निर्बंध लादल्याने जागतिक तेल आणि वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली.
पश्चिम आशिया हा भारताच्या तेल, वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. आमचे मित्र असलेल्या भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान या देशांच्या जहाजांना होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे अराघची यांनी इराण सरकारच्या चित्रवाहिनीला सांगितले. मात्र आमचे शत्रू असलेले देश व त्यांच्या मित्रदेशांच्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी देणार नाही, असेही अराघची यांनी स्पष्ट केले. गेल्या काही आठवड्यांत भारताने पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यास आणि होर्मूझ सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न केले आहेत.
इंधन टंचाईबद्दल अफवा पसरवाल तर कारवाई होणार
नवी दिल्ली/मुंबई : देशात इंधन तुटवडा नसून भारताकडे ६० दिवसांचा इंधनसाठा उपलब्ध आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. इंधनटंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या या जाणीवपूर्वक पसरवलेली दिशाभूल असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला सरकारने आहे. मात्र, महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमधील पेट्रोल पंपांवर दिवस-रात्र रांगा असून, पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.