राखीपौर्णिमा साजरी करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:08 IST2025-08-11T19:01:55+5:302025-08-11T19:08:18+5:30
तीन लहान मुलींसह आई-वडिलांचा जागीच मृत्यू!

राखीपौर्णिमा साजरी करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू...
UP Accident:उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडलेल्या मिक्सर मशीनला मोटारसायकल धडकल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नवाबगंज-शंकरपूर रस्त्यावरील हरबंशपूर पोलिस चौकीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर हा अपघात घडला. रक्षाबंधनाचा सण साजरा करून एकाच कुटुंबातील सहा जण एकाच मोटारसायकलवरुन घरी परतत होते. वाटेत त्यांची दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडलेल्या मिक्सर मशीनला धडकली.
घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू
टक्कर इतकी भीषण होती की, दुचाकी चालकासह दोन महिला आणि दोन किशोरवयीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे सुनीता (४० वर्षे), विजय कुमार वर्मा (३२ वर्षे), नीतू देवी आणि ज्ञानवती (८ वर्षे) अशी आहेत. तर, उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. अपघातात इतर दोघे जखमी झाले आहेत.
कुटुंबावर शोककळा
या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुःखद अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.