"9 समन्स 18 बहाणे! अरविंद केजरीवाल घाबरून पळत आहेत"; भाजपाची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 15:09 IST2024-03-19T15:08:19+5:302024-03-19T15:09:14+5:30
Arvind Kejriwal : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

"9 समन्स 18 बहाणे! अरविंद केजरीवाल घाबरून पळत आहेत"; भाजपाची खोचक टीका
दिल्लीमध्ये आप आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "जे लोक दररोज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन इतरांवर आरोप करायचे, ते आज समन्सला घाबरून पळून जात आहेत" असं म्हणत संबित पात्रा यांनी खोचक टीका केली आहे.
"अरविंद केजरीवाल यांना 6 महिन्यांत 9 समन्स पाठवण्यात आले होते, मात्र त्यांनी एकाही समन्सचा आदर केला नाही. 9 समन्सवर 18 बहाणे दिले. जेव्हा पहिला समन्स आला तेव्हा दिवाळी असल्याचा बहाणा केला, दुसरा समन्स आला तेव्हा गव्हर्नन्सचं कारण सांगितलं."
"तिसऱ्या समन्सवर मी विपश्यना करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं, चौथ्या वेळी विधानसभेचं कारण दिलं. पाचव्या समन्सच्या वेळी मध्य प्रदेशमध्ये निवडणुका असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे त्यांनी 9 समन्सवर 18 बहाणे दिले आहेत."
"जेव्हा एखादा खुनी खून करतो... तो खुनी कितीही हुशार असला तरी कुठेतरी रक्ताचे डाग राहतात आणि शेवटी खुन्यापर्यंत पोलीस पोहोचतात. अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या विश्वासाची आणि सत्याची हत्या केली आहे" असं म्हणत संबित पात्रा यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ED ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी नवीन समन्स बजावले आहे आणि त्यांना 21 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत केजरीवाल यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी नववे समन्स जारी करण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे समन्स बेकायदेशीर ठरवत प्रत्येक वेळी हजर राहण्यास नकार दिला आहे.