नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान उत्तर प्रदेशने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. राज्यातील तब्बल 33 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे केवळ 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 67 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या दरम्यान 16 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 33 जिल्ह्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नसून हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये 33 जिल्हे पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये अलिगड, अमरोहा, अयोध्या, बागपत, बलिया, बलरामपूर, बांदा, बस्ती, बहराइच, भदोही, बिजनौर, चंदौली, चित्रकूट, देवरिया, एटा, फतेहपूर, गाझीपूर, गोंडा, हमीरपूर, हापूर, हरदोई, हाथरस, कासगंज, कौशांबी, ललितपूर, महोबा, मुरादाबाद, मुझफ्फरनगर, पीलीभीत, रामपूर, शामली, सिद्धार्थनगर आणि सोनभद्र यांचा समावेश आहे. राज्याचा पॉझिटिव्ह दर 0.01 पेक्षा कमी झाला आहे आणि रिकव्हरी दर 98.7 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल सात कोटी 44 लाख 95 हजार 406 कोरोना सँपलची तपासणी करण्यात आली आहे.
33 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही सक्रिय रुग्ण नाही
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना व्यवस्थापनासाठी गठित केलेल्या टीमशी झालेल्या बैठकीत सांगितले की, अग्रेसिव्ह ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लगेचच ट्रीटमेंट असे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर प्रभावी नियंत्रण असताना परिस्थिती सामान्य होत आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील परिस्थिती बरी आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही सक्रिय प्रकरण नाही. दररोज सरासरी अडीच लाख कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी लसीचा किमान एक डोस दिला घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतात जर नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं मत आता तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला. देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अजूनही दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नसून केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. भारतात येऊन गेलेली कोरोनाची दुसरी लाट ही डेल्टा व्हायरसमुळेच आली होती. त्यामुळे अनेकांना डेल्टाची लागण होऊन गेली असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं मत डॉ. गगनदीप कांग यांनी म्हटलं आहे. भारतीयांना आता डेल्टा व्हायरसची फारशी भीती नसून जर कुठलाही नवा व्हेरिएंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेची फारशी भीती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतीयांच्या शरीरात या व्हायरसविरोधात अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत.