नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
आंध्र प्रदेशच्या अनंतपूर आणि कुरनूलमध्ये ऑक्सिजन पूरवठा बंद झाल्याने 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूरच्या सरकारी रुग्णालयात 11 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कुरनूलमधील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नसल्याचं म्हटलं आहे. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाला भाजपाचे अनेक खासदार आणि आमदार पत्र लिहून नाराजी व्यक्त करत आहेत. हे पत्रं सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उत्तर प्रदेशभाजपामध्ये सर्व काही ठीक नसल्याचंच यातून समोर येतं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची कोणतीही आणि कुठेही वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे.
लखीमपूर खीरीच्या गोला मतदारसंघाचे भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहिलं होतं. आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचं गिरी यांनी या पत्रात उल्लेख केला होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघात बेड आणि आरोग्य व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती. 'लोक ऑक्सिजनसाठी रडत आहेत आणि आमदार असूनही त्यांची मी मदत करू शकत नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत राहिलो परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही' अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली आहे.