नालंदा येथील शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यावरून बिहार काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "या मृत्यूंसाठी राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी दिली. मंगळवारी पाटण्यातील काँग्रेस मुख्यालय 'सदाकत आश्रम' येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राजेश राम म्हणाले की, भाजपा-जेडीयू सरकार भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. भाजपाच्या पंचायत स्तरावरील नेत्यांच्या मागे फिरण्यासाठी पोलीस उपलब्ध असतात, मात्र शीतला मंदिरात आलेल्या हजारो भाविकांच्या सुरक्षेसाठी सरकारने एकाही पोलिसाची नियुक्ती केली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
"लोक एकमेकांवर पडले", शीतला मंदिरात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
काँग्रेस नेत्यानी पुढे सांगितलं की, १० हजारांहून अधिक भाविकांची गर्दी असतानाही तिथे व्यवस्था राखण्यासाठी एकही पोलीस उपस्थित नव्हता. चेंगराचेंगरीनंतर लोक गुदमरून तडफडून मरत होते, पण वेळेवर रुग्णवाहिकाही पोहोचली नाही. जर जखमींना वेळेत रुग्णालयात नेलं असतं तर अनेकांचा जीव वाचवता आला असता.
राजेश राम यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की, "बिहारमध्ये दुर्दैवाने असं सरकार आहे ज्यांना लोकांच्या सुरक्षेची चिंता नाही. आधीच लोक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त आहेत आणि आता सरकारने वीज दरात प्रचंड वाढ केली आहे."
Video - भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी
संध्याकाळी ५ ते रात्री ११ ही वेळ जेवण बनवण्याची आणि मुलांच्या अभ्यासाची असते, पण याच काळात वीज दरात २० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तसेच कडक उन्हाळ्यात रात्री ११ ते सकाळी ९ या काळात, जेव्हा पंखे आणि कुलरची सर्वाधिक गरज असते, तेव्हा दर १० टक्क्यांनी वाढवले आहेत. याचा थेट फटका गरिबांना बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं.