“PM मोदींनी देशाला संकटातून बाहेर काढले, राहुल गांधींनी जनतेची दिशाभूल केली”: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:12 IST2026-03-31T12:10:10+5:302026-03-31T12:12:42+5:30
CM Devendra Fadnavis Assam Visit: भाजपाला आसाममध्ये मोठा विजय प्राप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

“PM मोदींनी देशाला संकटातून बाहेर काढले, राहुल गांधींनी जनतेची दिशाभूल केली”: CM फडणवीस
CM Devendra Fadnavis Assam Visit: देशात इंधन टंचाई किंवा गॅस पुरवठ्याबाबत काळजीची कोणतीही परिस्थिती नाही. उलट आपल्या आजूबाजूचे देश, आशियाई देश, युरोपातील देश यांची परिस्थिती पाहिली, तर ती बिकट आहे. युद्धामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन लावले आहे. कोणी आठवड्यातून तीन दिवस काम, चार दिवस काम धोरण लागू केले आहे. भारत असा एकमेव देश आहे, जिथे जनजीवन विस्कळीत झाले नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशाला संकटातून बाहेर काढले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआसामला गेलेले आहेत. पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदी दिवस देशात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासू दिली नाही. गॅस पुरवठ्याची साखळी सुरळीत ठेवली. अशा प्रकारचे व्यवस्थापन क्वचितच आढळून येते. पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. परंतु, इंधन साठा पुरेसा असताना, लोकांना रांगेत उभे केले. पेच प्रसंगात जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केले. हे अत्यंत चुकीचे होते, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
आसामची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी
देशातील गरीब लोकांबद्दल पंतप्रधान मोदींच्या मनात आस्था आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी आधी कुणी घेतले नसतील, असे अनेक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले. आसाममधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ए फॉर आसाम हा नारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. केवळ यापुरते मर्यादित न राहता, ते सत्यात आणून दाखवले. त्यामुळे आसाममधील जनता पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
भाजपा आणि मित्र पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत
लोकांचा विश्वास प्राप्त करणे महत्त्वाचे असते. लोकांना विश्वास दिला, तर तुम्हाला मोठा जनादेश मिळू शकतो. परंतु, काँग्रेसने लोकांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस आता लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच काँग्रेसला मते मिळत नाहीत. मी आसाममध्ये जे काही पाहात आहे, त्यानुसार भाजपा आणि मित्र पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
🕚 10.49am | 31-3-2026📍Assam.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 31, 2026
LIVE | Media Interaction#Maharashtra#Assamhttps://t.co/yn45a5NnsU