लग्नघरावर दुःखाचा डोंगर; वरात्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ९ ठार, ५० हून अधिक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:46 IST2026-01-19T12:43:09+5:302026-01-19T12:46:17+5:30
Chhattisgarh Accident: ढोल-ताशांच्या जागी आक्रोश; लग्नासाठी निघाले, मृत्यूने गाठले..!

लग्नघरावर दुःखाचा डोंगर; वरात्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ९ ठार, ५० हून अधिक गंभीर जखमी
Chhattisgarh Accident: छत्तीसगडच्या बलरामपूरहून झारखंडमधील लातेहार जिल्यातील महुआडांड येथे लग्न समारंभासाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महुआडांड पोलीस ठाणे क्षेत्रातील ओरसा घाटीमध्ये ही ओव्हरलोड बस अनियंत्रित होऊन पलटली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी, ब्रेक फेल झाल्याचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील पिपरसोत गावातून सुमारे ९० प्रवासी एका बसमधून प्रवास करत होते. मात्र संबंधित बसची प्रवासी क्षमता केवळ ५० जणांची होती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये असल्याने ओरसा घाटीमध्ये उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले. याचवेळी बसचे ब्रेक फेल झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची मोठी संख्या होती. बस पलटल्यानंतर परिसरात एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने जखमींना तातडीने महुआडांड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
गंभीर जखमींना रांची येथील रिम्समध्ये हलवले
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन डझनांहून अधिक प्रवाशांना रांची येथील रिम्स (RIMS) रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मृतांची ओळख पटली
या भीषण अपघातात लीलावती देवी, रमेश मनिका, फगुआ राम, रेशांती देवी, प्रेमा देवी, सीता देवी, सोनामती देवी, सुखना भुईया आणि विजय सिंह यांचा मृत्यू झाला. सर्व मृतक हे छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील पिपरसोत गावाचे रहिवासी होते.
पोलिसांकडून चौकशी सुरू
घटनेनंतर पोलिसांनी अपघातस्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. अपघात नेमका ब्रेक फेल झाल्यामुळे झाला की, ओव्हरलोडमुळे चालक नियंत्रण ठेवू शकला नाही, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लातेहार जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.