'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 21:21 IST2019-02-14T21:20:35+5:302019-02-14T21:21:18+5:30
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार'
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात जवळपास 40 जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांना माजी लष्कर प्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच अशा घटनानंतर नेहमीच माझं रक्त सळसळत. या जवानांच्या रक्ताच्या एक एक थेंबाचा बदला घेतला जाईल, असेही व्ही.के. सिंग यांनी म्हटल आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येताच, त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण शोकसागरात बुडाला आहे. तसेच जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या उरीप्रमाणेच या हल्ल्याचाही बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लष्कराने त्या हल्ल्याला मिशन 'सर्जिकल स्ट्राईक' हे नाव दिले होते. या मिशनअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर, भारतीय सैन्याची ताकत जगभरातील देशांनी अनुभवली. त्यामुळे, आताही उरीप्रमाणेच अवंतीपुरा हल्ल्याचाही बदला घ्या, अशी भावना नेटीझन्स व्यक्त करत आहेत. तर, आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होऊन जाऊ द्या अशी मागणीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करताना दिसत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवरुन नेटीझन्सने या हल्ल्याचा बदला हीच शहीदांना श्रद्धांजली असल्याचं म्हटलंय.