आतापर्यंत ५१० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त; निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये धडाका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:32 IST2026-04-28T08:32:10+5:302026-04-28T08:32:39+5:30
ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असून, विधानसभा निवडणूक २०२६ पूर्णपणे मुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंत ५१० कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त; निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये धडाका
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली असून, राज्यात आतापर्यंत ५१० कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. निवडणुकीत पैशांचा आणि प्रलोभनांचा गैरवापर रोखण्यासाठी आयोगाने राबवलेल्या मोहिमेतून हे मोठे यश मिळाले आहे.
आयोगाचा कडक इशारा
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदारांना प्रभावित करण्यासाठी दिले जाणारे कोणतेही प्रलोभन किंवा धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असून, विधानसभा निवडणूक २०२६ पूर्णपणे मुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, ही जप्ती २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण ३३९ कोटी रुपयांच्या वसुलीपेक्षा जास्त आहे.
जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा तपशील
निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणालीच्या आकडेवारीनुसार, २६ फेब्रुवारी ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान खालीलप्रमाणे जप्ती केली आहे.
साहित्य अंदाजे किंमत/प्रमाण
रोख रक्कम ३० कोटी रुपये
अवैध मद्य ४८ लाख लीटरहून अधिक
ड्रग्ज ११० कोटी रुपये
किमती धातू ५८ कोटी रुपये
फ्रीबीज १८५ कोटी रुपये
कारवाईचा वेग व यंत्रणा
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी राज्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २,७२८ फ्लाइंग स्क्वॉड पथके अहोरात्र गस्त घालत आहेत. कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांत कारवाई करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ३,१४२ स्टॅटिक सर्व्हिलन्स पथके नाकेबंदी करून तपासणी करत आहेत.