आसाममध्ये UCC लागू करणार, चार विवाहांवर बंदी घालणार; अमित शाहांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 20:19 IST2026-03-29T20:18:20+5:302026-03-29T20:19:25+5:30
Assam Assembly Eelections 2026 : 'पुढील पाच वर्षांत प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर पाठवले जाईल.'

आसाममध्ये UCC लागू करणार, चार विवाहांवर बंदी घालणार; अमित शाहांची मोठी घोषणा
Assam Assembly Elections 2026 :आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नलबारी येथील सभेत मोठी घोषणा केली. भाजप सरकार आसाममध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू करणार असून, चार विवाहांवर बंदी घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
आसाममध्ये UCC लागू करण्याची घोषणा
नलबारी येथे आयोजित सभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितले की, आसाममध्ये भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात समान नागरी संहिता लागू केली जाईल आणि चार विवाहांवर बंदी घालण्यात येईल. त्यांनी काँग्रेसवर आरोप करताना म्हटले की, मतांसाठी काँग्रेसने आसामचे लोकसंख्यात्मक स्वरूप बदलले आणि घुसखोरीला प्रोत्साहन दिले.
HM Shri @AmitShah addresses public meeting in Nalbari, Assam. https://t.co/Q7cFCu7BaW
— BJP (@BJP4India) March 29, 2026
घुसखोरांविरोधात कारवाईचा इशारा
अमित शाह यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर पाठवले जाईल. त्यांनी दावा केला की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सीमारेषा मजबूत केल्या असून, घुसखोरांनी बळकावलेली सुमारे 1.25 लाख एकर जमीन परत मिळवली आहे.
आसाममध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावा
शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आसाममध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावा केला. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत बोडो शांतता करार, कार्बी आंगलोंग करार, DNLA करार आणि ULFA संघटनेसोबत करार करण्यात आले, ज्यामुळे हजारो लोकांनी शस्त्रे टाकली. भाजपच्या शासनकाळात राज्यातील हिंसाचार आणि बॉम्बस्फोट थांबले असून राज्यात स्थिरता निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.
9 एप्रिलला मतदान
आसाममधील सर्व 126 विधानसभा जागांसाठी 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर, मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार असून, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.