बिर्याणीत झोपेच्या २० गोळ्या टाकल्या, नंतर प्रियकराच्या मदतीने आवळला पतीचा गळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:46 IST2026-01-23T16:44:22+5:302026-01-23T16:46:53+5:30
Andhra Pradesh Crime : अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या

बिर्याणीत झोपेच्या २० गोळ्या टाकल्या, नंतर प्रियकराच्या मदतीने आवळला पतीचा गळा...
Andhra Pradesh Crime : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिलुवुरु गावातील एका महिलेने बिर्याणीत झोपेच्या गोळ्या मिसळून आधी पतीला बेशुद्ध केले आणि नंतर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा उशीने गळा दाबून निर्घृण हत्या केली. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
सिनेमा हॉलच्या तिकीट खिडकीपासून सुरू झाले अनैतिक संबंध
पोलिसांच्या माहितीनुसार, मृताचे नाव लोकम शिवनागरजू असून, ते चिलुवुरु गावातील रहिवासी व पेशाने भाजीपाला व्यापारी होते. त्यांचे लग्न २००७ मध्ये लक्ष्मी माधुरी हिच्याशी झाले होते. दाम्पत्याला दोन मुले आहेत. लक्ष्मी माधुरी विजयवाडा येथील एका चित्रपटगृहात तिकीट काउंटरवर काम करत होती. त्याच ठिकाणी तिची ओळख गोपी याच्याशी झाली आणि पुढे हे संबंध अनैतिक नात्यात बदलले.
पतीला हैदराबादला पाठवले; परत आल्यावर वाढले वाद
पोलिस तपासानुसार, लक्ष्मी माधुरीला पतीचा व्यवसाय पसंत नव्हता. तिने त्याला काम सोडण्यास भाग पाडले. गोपी हैदराबादमध्ये ट्रॅव्हल्स व्यवसायात कार्यरत असल्याने, तिने शिवनागरजू यांना तेथे नोकरीसाठी पाठवले. मात्र काही काळानंतर शिवनागरजू पुन्हा गावात परतले. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढले. पतीची घरातील उपस्थिती प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरू लागल्याने, त्याला दूर करण्याचा कट रचला.
बिर्याणीत २० झोपेच्या गोळ्या; रात्री ११.३० वाजता खून
१८ जानेवारीच्या रात्री लक्ष्मी माधुरीने बिर्याणी तयार करून त्यात सुमारे 20 झोपेच्या गोळ्या कुटून मिसळल्या. जेवणानंतर शिवनागरजू गाढ झोपी गेले. रात्री सुमारे ११.३० वाजता प्रियकर गोपी घरात आला. त्याने झोपलेल्या शिवनागरजूच्या छातीवर बसून हात धरले, तर लक्ष्मी माधुरीने उशीने तोंड व नाक झाकून पतीचा गळा दाबला. श्वास कोंडून शिवनागरजू यांचा मृत्यू झाला.
सकाळी हार्ट अटॅकचा बनाव
हत्येनंतर लक्ष्मी माधुरी संपूर्ण रात्र घरातच थांबली. पहाटे सुमारे 4 वाजता तिने शेजाऱ्यांना बोलावून गोंधळ घातला आणि पतीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा बनाव केला. मात्र, शेजाऱ्यांना आधीपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादांची आणि अनैतिक संबंधांची माहिती होती. तसेच मृताच्या कानातून रक्त येत असल्याचे आणि शरीरावर जखमेच्या खुणा दिसल्याने त्यांचा संशय अधिक बळावला.
पोस्टमॉर्टममध्ये खून उघड; पुढील कारवाई सुरू
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अहवालात छातीच्या हाडांना फ्रॅक्चर आणि श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर लक्ष्मी माधुरीची चौकशी केली असता हत्येचा कट उघडकीस आला. सध्या आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.