अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात FIR दाखल; महाराष्ट्र पोलीस करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 09:01 IST2026-03-25T08:55:08+5:302026-03-25T09:01:11+5:30
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात कंपनीविरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल झाला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात FIR दाखल; महाराष्ट्र पोलीस करणार तपास
Rohit Pawar Zero FIR: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे. या विमान अपघातामागे मोठे गुन्हेगारी कारस्थान असल्याचा दावा करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी थेट शेजारील कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे झीरो एफआयआर दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यामुळे आपल्याला परराज्यात जावे लागल्याचे सांगत रोहित पवारांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रोहित पवार यांनी सातत्याने घातपाताचा संशय व्यक्त केला होता. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना रोहित पवार यांनी माहिती दिली की, त्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अन्वये बंगळुरूच्या शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
"मी मुंबईतील मरीन ड्राईव्ह, बारामती आणि सीआयडीकडे चकरा मारल्या, पण महाराष्ट्रात एफआयआर नोंदवला गेला नाही. ज्यांनी अजितदादांमुळे सत्ता उपभोगली, त्यांनी किमान मिठाला जागले पाहिजे होते," असा टोला रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
तक्रारीत धक्कादायक दावे
रोहित पवार यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीवर आणि संबंधित यंत्रणांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. डीजीसीएच्या ऑडिटनुसार, बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ हे विमान तांत्रिकदृष्ट्या सक्षम नव्हते. त्याची देखभाल कागदपत्रांवर खोटी दाखवण्यात आली होती.
तसेच विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर याचा मद्यपानाशी संबंधित जुना रेकॉर्ड होता. अपघाताच्या वेळी वैमानिकाची शांतता ही संशयास्पद असून तो नशेत असण्याची शक्यता तक्रारीत वर्तवण्यात आली आहे. विमानाचे क्रू मेबर्स शेवटच्या क्षणी का बदलण्यात आले? तसेच धावपट्टी अचानक का बदलली गेली? यावर पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हीएसआर कंपनीच्या मालकाने माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही"अशी भाषा वापरल्याचा दावा रोहित पवारांनी केला. धक्कादायक म्हणजे अपघातानंतरही सरकारने या कंपनीला ८० कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. हा केवळ अपघात नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपवण्यासाठी रचलेले एक पद्धतशीर कारस्थान असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
'झीरो एफआयआर' म्हणजे काय आणि आता पुढे काय?
जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा तो कोणत्या क्षेत्रांत घडला याची वाट न पाहता कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते, त्याला झीरो एफआयआर म्हणतात. ही तक्रार आता कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणाचा फौजदारी तपास करणे अनिवार्य झाले आहे.
सभागृहात गोंधळ आणि तहकुबी
रोहित पवार हे इतका गंभीर विषय मांडत असताना सत्ताधारी बाकावर केवळ एकच मंत्री उपस्थित होते. यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.