अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:49 IST2025-06-18T12:49:13+5:302025-06-18T12:49:24+5:30
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या Air India च्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्याविमानअपघाताबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळजवळ १२ वर्षे जुन्या या बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ विमानाची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच, तीन महिन्यांपूर्वी (मार्च २०२५ मध्ये) या विमानाचे इंजिन बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुढील तपासणी डिसेंबरमध्ये होणार होती
मीडिया रिपोर्सनुसार, एअर इंडियाच्या या विमानाची संपूर्ण तपासणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती, तर पुढील तपासणी या वर्षीच्या डिसेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यापूर्वीच विमानाचा सर्वात भीषण अपघात झाला. तसेच, एप्रिल 2025 मध्ये एअर इंडियाने या विमानाचे विमा संरक्षण ७५० कोटी रुपयांवरून ८५० कोटी रुपये केल्याची माहितीही समोर आली आहे.
एअर इंडियाची सेवा विस्कळीत
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, त्या अपघातानंतर डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एअर इंडियाने सर्व विमानांची सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. कंपनीकडे असलेल्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्यावर ही तपासणी केली जाईल. तपासणीनंतरच त्यांना पुढील ऑपरेशनसाठी मान्यता दिली जाईल. एअर इंडियाने बोईंग ७८७ विमानांपैकी नऊ विमानांवर अशा तपासणी पूर्ण केली आहे, तर उर्वरित २४ विमानांसाठी डीजीसीएने दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. तसेच, या तपासणीमुळे काही उड्डाणांसाठी वेळ वाढू शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.
एअर इंडियाने जाहीर केली नुकसान भरपाई
एअर इंडियाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची अंतरिम भरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या भरपाईपेक्षा वेगळी आहे.
अपघात कसा झाला?
अहमदाबादमधील अपघात हा देशातील सर्वात वाईट हवाई अपघातांपैकी एक आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमान क्रमांक AI 171 मेघनी नगरमधील एका वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले, ज्यामध्ये 241 प्रवाशांसह सुमारे 270 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव बचावले.
विमान जमिनीवर पडताच मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. अपघातानंतर विमानाच्या ढिगाऱ्यातून काढलेले मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते, ज्यामुळे डीएनए चाचणीनंतर त्यांची ओळख पटवली गेली. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल.