शिक्षणासाठी, उपचारांसाठी, एअर ॲम्ब्युलन्ससाठीही कर्ज; विमान अपघाताने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:58 IST2026-02-24T11:57:14+5:302026-02-24T11:58:17+5:30
झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाच्या जंगलात कोसळलेल्या एअर ॲम्ब्युलन्सच्या ढिगाऱ्याखाली सात जणांचं आयुष्य संपलं.

फोटो - आजतक
झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाच्या जंगलात कोसळलेल्या एअर ॲम्ब्युलन्सच्या ढिगाऱ्याखाली सात जणांचं आयुष्य संपलं. या अपघातात जीव गमावलेले डॉ. विकास कुमार गुप्ता रांचीच्या सदर रुग्णालयात कार्यरत होते. त्यांचे वडील बजरंगी प्रसाद, बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. वडिलांनी आम्ही आमची सर्व जमीन विकली होती. फक्त एकच स्वप्न होतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा असं म्हटलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
विकास यांनी ओडिशामधील कटक येथून एमबीबीएस पूर्ण केलं होतं. त्यांचं शिक्षण सोपं नव्हतं. फी, हॉस्टल आणि पुस्तकांसाठी पैसे जमवताना वडिलांची ओढाताण व्हायची. ढसाढसा रडत वडील सांगतात, "लोक म्हणायचे इतकं कर्ज घेऊ नकोस, कसं फेडणार? पण मी म्हणालो, मुलगा शिकला की सर्व काही फेडून टाकेल." डॉ. विकास यांना सात वर्षांचा एक मुलगा आहे.
संजय कुमार चंदवा शहरात एक छोटेसं हॉटेल चालवत होते. गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, ज्यात संजय गंभीररीत्या भाजले गेले. त्यांना आधी रांचीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथला उपचार महागडा होता, दररोज हजारो रुपये खर्च होत होते. कुटुंबाची सर्व पुंजी संपली, मग नातेवाईकांकडे मदत मागितली गेली. डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचा सल्ला दिला. रस्तेमार्गे नेणे जोखमीचे असल्याने 'एअर ॲम्ब्युलन्स' हाच एकमेव पर्याय उरला होता.
एअर ॲम्ब्युलन्स बुक करण्यासाठी सुमारे ७.५ ते ८ लाख रुपयांची गरज होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इतकी रक्कम जमवणं अशक्य होतं. संजय यांचे भाऊ अजय, जे हरियाणा सरकारमध्ये कार्यरत आहेत, त्यांनी सांगितले की, "आम्ही नातेवाईकांकडून कर्ज घेतले. काहींनी विश्वासावर पैसे दिले, तर काहींनी व्याजाने. आम्हाला वाटलं जीव वाचला तर सर्व काही फेडू." रुग्णाला एअर ॲम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आले. सोबत पत्नी, एक नातेवाईक आणि वैद्यकीय पथक होतं. दिल्लीत गेल्यावर उपचार होतील आणि संजय वाचतील, अशी आशा घरच्यांना होती. पण घरी पोहोचताच टीव्हीवर बातमी आली की चतराच्या सिमरिया जंगलात एअर ॲम्ब्युलन्स कोसळली.
या अपघातात १७ वर्षीय ध्रुव कुमार याचाही मृत्यू झाला. सिमडेगा येथील रहिवासी असलेला ध्रुव रांचीत राहून शिक्षण घेत होता. त्याचं मोबाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याचं स्वप्न होतं. त्याचे मामा संजय भाजल्याने त्याने दिल्लीला जाण्याचं थांबवलं आणि त्यांची सेवा करू लागला. जेव्हा डॉक्टरांनी दिल्लीला रेफर केलं, तेव्हा तोही त्यांच्यासोबत निघाला.
विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हवामान खराब झाले. सिमरियाच्या घनदाट जंगलावर विमानाचे संतुलन बिघडलं आणि ते करम टॉडजवळ कोसळलं. पायलट, सह-पायलट, वैद्यकीय पथक, रुग्ण आणि नातेवाईक अशा सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. दुर्गम भागात मदत पथकाला चार किलोमीटर पायी चालत ढिगाऱ्यापर्यंत पोहोचावं लागलं.