"देशात भीती पसरवण्याचे षडयंत्र"; पश्चिम आशियातील युद्धावरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:28 IST2026-03-11T16:27:52+5:302026-03-11T16:28:20+5:30
संकटकाळात भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"देशात भीती पसरवण्याचे षडयंत्र"; पश्चिम आशियातील युद्धावरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर थेट हल्ला चढवत गंभीर आरोप केला. देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी या पक्षांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे भारतीयांची चिंता होणे स्वाभाविक आहे, कारण तिथे आपले लाखो बांधव कार्यरत आहेत. संकटकाळात भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आपली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर हल्लाबोल -
पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष या जागतिक संकटातही आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. "देशात परिस्थिती बिघडावी आणि भारतीय नागरिक तिथे संकटात अडकावेत, यासाठी काँग्रेस जाणीवपूर्वक चिथावण्याचा बेजबाबदार प्रयत्न करत आहे." यातून मोदींना शिव्या देण्याचा एक नवीन कार्यक्रम सुरू करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, गल्फ देशांमधील मित्र राष्ट्रांच्या सरकारांकडून आपल्या नागरिकांची काळजी घेतली जात असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
आत्मनिर्भरतेचा आग्रह -
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत'चा उल्लेख केला. पुन्हा भर दिला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपल्या कार्यकाळात देशाला परकीय देशांवर अवलंबून ठेवले, तर सध्याचे सरकार देशाला स्वावलंबी बनवत आहे. ऊर्जा क्षेत्रातील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांना (EV) सरकारने मोठे प्राधान्य दिले आहे. सौर ऊर्जेची क्षमता वाढवण्यासोबतच केरळशारख्या राज्यांतही नवीन प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संकटकाळात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असल्याचे सिद्ध झाले असून, विरोधकांच्या चुकीच्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केले आहे.