जेष्ठ नागरिकांना ३००० पेन्शन, महिलांना २५०० अन्न सुरक्षा कार्ड; भाजपाच्या केरळम जिंकण्यासाठी मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 20:18 IST2026-03-31T20:17:27+5:302026-03-31T20:18:52+5:30
BJP Manifesto for Kerala: केरळम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आणि विधवांना प्रत्येकी ३००० रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे.

जेष्ठ नागरिकांना ३००० पेन्शन, महिलांना २५०० अन्न सुरक्षा कार्ड; भाजपाच्या केरळम जिंकण्यासाठी मोठ्या घोषणा
केरळम विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी भाजपाने ताकद पणाला लावली आहे. भाजपाने आपला जाहीरनामा मंगळवारी जाहीर केला. यात भाजपाचे सरकार आले, तर गरीब महिलांना रेशन घेण्यासाठी अन्न सुरक्षा कार्ड दिले जाईल, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि विधवांना महिन्याला प्रत्येकी ३००० रुपये पेन्शन दिली जाईल अशी घोषणा केली आहे.
भाजपाने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, केरळममध्ये सरकार बनले तर कुटुंबातील सर्वांसाठी एक विमा योजना आणली जाईल. त्याचबरोबर केरळममध्ये एक एम्स सुरू करण्यात येईल.
भाजपाच्या केरळमच्या मतदारांसाठी घोषणा
एक अन्न सुरक्षा कार्ड दिले जाईल, त्याचा वापर करून प्रत्येक महिन्याला २५०० पर्यंत रेशन खरेदी करता येईल. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला ३००० हजार पेन्शन सुरू करू.
संपूर्ण राज्यात मोबाईल हॉस्पिटल सेवा सुरू करू. त्याचबरोबर मोफत रुग्णवाहिका सेवाही सुरू केली जाईल.
वर्षातून दोन वेळा एलपीजी सिलेंडरवर अनुदान दिले जाईल. प्रत्येक महिन्याला २० हजार लीटर पाणी मोफत दिले जाईल.
विकसित केरळम योजनेनुसार, तिरुवनंतपुरम ते कन्नूर, कोझिकोड ते कालपेट्टा आणि थ्रिसूर ते पलक्कड अशा बुलेट ट्रेन सुरू करण्यात येईल.
चेनगन्नूर ते पांबा आणि पांबा ते पथनामथिट्टापर्यंत सबरी रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. नीलंबूर ते नांजागुडपर्यंत नवीन रेल्वे सुरू केली जाईल. त्याचबरोबर थ्रिसूर ते गुरूवयूर रेल्वे मार्गाचा तिरुरपर्यंत विस्तार करू अशी घोषणाही भाजपाने केली आहे. तिरुवनंतपूरम आणि कोझिकोडे या दोन शहरात मेट्रो सेवा सुरू करण्याचे आश्वासन भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.