नाशिक : नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर विकसित करण्यात आलेले पक्षी अभयारण्य विविध स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते, मात्र हे अभयारण्य लोकप्रियतेपासून काहिसे वंचित राहिले होते. यावर्षी प्रथमच वन्यजीव विभागाने पुढाकार घेत ‘बर्ड फेस्टिव्हल’भरविल्याने पक्षीप्रेमींची जत्रा भरली आहे.निफाड तालुक्यातील चापडगाव येथील निसर्ग संकु ल केंद्र अर्थात पक्षी अभयारण्याच्या मुख्य पक्षी निरीक्षण केंद्राच्या आवारात तीनदिवसीय महोत्सवाला मागील शुक्रवार (दि.१९) पासून प्रारंभ झाला आहे. या पक्षी महोत्सवांतर्गत विविध वन्यजीव छायाचित्रकार, अभ्यासक, पयार्वरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्रांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात पर्यावरणविषयक व जैवविविधतेमधील अन्नसाखळीच्या महत्त्वाविषयी मंथन घडून येत आहे.
या चर्चासत्रांसाठी चापडगाव परिसरातील एकूण अकरा गावांमधील प्राथमिक शाळांसह माध्यमिक शाळांचे विद्यार्थी व शहरातील सिडको, इंदिरानगर, सातपूर, गंगापूररोड आदी परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांची सतत वर्दळ आहे. दोन दिवसांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी भेटी दिल्याचा दावा वन-वन्यजीव विभागाने केला आहे. वन्यजीव छायाचित्रकार अतुल धामणकर, राजू कसांबे, नंदकिशोर दुधे, विभास अमोनकर, डॉ. डेर्ले, दत्ता उगावकर, अभय केवट, डॉ. प्राची मेहता आदींनी मार्गदर्शन केले. विविध शाळांचे विद्यार्थी चर्चासत्राला उपस्थित राहिल्याने भावी पिढीमध्ये निसर्गाविषयी नक्कीच जागृती होण्यास मदत होणार आहे.